सध्या सोशल मीडियावर ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. कामाठीपुरात दबदबा असलेल्या गंगूबाईंच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून यात अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिका साकारत आहे. अलिकडेच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर अनेकांनी आलियाऐवजी दीपिका किंवा विद्या बालनची मुख्य भूमिकेसाठी निवड करायला हवी होती असं म्हटलं आहे.

अलिकडेच ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये आलियाचा कधीही न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला. डौलदार चाल, आवाजातील भारदस्तपणा आणि करडी या सगळ्यामुळे आलियाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. परंतु, आलिया या भूमिकेसाठी योग्य नसल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

‘आलियाने यात उत्तमरित्या अभिनय केला आहे. परंतु, या भूमिकेसाठी ती योग्य नाही’, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, ‘आलियाऐवजी दिपिका किंवा प्रियांकाची निवड योग्य ठरली असती’, असं अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

 

‘गंगूबाईच्या भूमिकेसाठी विद्या बालन योग्य हो’ती, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, ‘आलिया लहान मुलगी वाटते, या भूमिकेसाठी ती योग्य नाही’, असं अन्य काही जणांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईतील माफियांच्या टोळीत असलेल्या गंगूबाईचा बेधडक स्वभाव आणि तिच्या आयुष्यातील टप्पे सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी केला आहे. येत्या 30 जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.