सतीश राजवाडे, दिग्दर्शक

गिरगावातल्या आमच्या जुन्या घरी राजवाडे कुटुंबाचा गणपती जवजवळ २१ वर्षे येत होता. त्यानंतर मी पार्ल्याला राहायला आलो. मला पहिला मुलगा झाल्यानंतर मी दिड दिवसांचा गणपती आणण्यास प्रथम सुरुवात केली. मग मुलगी झाल्यानंतर गौरी-गणपतीची प्रतिष्ठापना आम्ही करायला लागलो. खडयाची गौरी आम्ही आणतो. गोटीच्या आकाराच्या खडयांपासून गौरी तयार करण्यात आलेली असते. बाप्पाच्या पदार्पणाच्या दुस-या दिवशी घरी सत्यनारायणाची पूजा असते. यानिमित्ताने, सर्व कुटुंबिय, नातेवाईक, मित्रमंडळी यांची भेट होते. संपूर्ण राजवाडे कुटुंब आमच्या घरी जमतं. लहान मुलांनाही गणपतीचं फार वेड आहे. त्यांची लहान मित्रमंडळीही बाप्पाच्या दर्शनासाठी घरी येत असल्यामुळे तेही खूश असतात. हे सात दिवस एकंदरीत संपूर्ण वातावरणचं आल्हाददायी आणि प्रसन्न वाटतं. मला तर दिवाळीपेक्षाही हा सण जास्त महत्त्वाचा वाटतो. कारण, सगळ्या मोठ्या सणांची सुरुवात गणेशोत्सवानंतरचं होते.
गणेशोत्सवातले हे दिवस शक्यतो मी दोन्ही वेळच्या आरतीला घरी राहण्याचा प्रयत्न करतो.  तुटक तुटक का होईना पण बाप्पाची आरती मुलांसोबत आम्हालाही जमायला लागते. पहिल्या दिवशी आम्ही २१ उखडीच्या मोदकांचा नैवेद्य गणरायाला दाखवतो. थर्माकॉल किंवा पुठ्ठ्याचे डेकोरेशन न करता अगदी साध्या पद्धतीने गणपतीची आरास केली जाते. घरातचं उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रीक तोरणांनी सजावट करतो. पूर्वी गिरगावात असताना रात्रभर जागरण करून आम्ही थर्माकॉलची आरास करायचो. पण आता शक्यतो साधेपणानेच गणेशोत्सव साजरा करतो. मुलं  मोठी झाली की मग ती त्यांच्या मनाने सजावट करतीलचं. दरवर्षी वेगवेगळ्या मूर्तीची प्रतिष्ठापना आमच्या घरी केली जायची. मात्र, यंदाची जी मूर्ती आहे तीच पुढेही मेन्टेन ठेवण्याचे मी ठरवलेयं. यावेळी आम्ही पीओपी आणि शाडूची माती या दोघांचेही मिश्रण असलेली मूर्ती आणली आहे. खूप घरगुती पद्धतीने हा सोहळा आमच्याकडे साजरा केला जातो. गणरायाचे विसर्जनही चौपाटीवर न करता पार्ल्यात विसर्जनासाठी बांधण्यात आलेल्या कृत्रिम तलावात करतो.