छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे ‘बिग बॉस.’ सध्या बिग बॉस १४चे पर्व चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कविता कौशिकने बिग बॉसचे घर सोडले. आता तिच्या पाठोपाठ गायक राहुल वैद्यने देखील बिग बॉस १४चे घर सोडण्याचा निर्णय घेतला. याता त्याच्या या निर्णयावर अभिनेत्री काम्या पंजाबी आणि गौहर खानने प्रतिक्रिया दिली आहे.

काम्याने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने ‘बिग बॉसच्या इतिहासात असे कधीच झाले नाही की एखाद्या अतिशय चांगला स्पर्धक बिग बॉसच्या घरातून स्वत:हून बाहेर पडतो. तुला इतके टोकाचे पाऊस उचलण्यासाठी त्यांनी मानसिकदृष्ट्या तुला किती त्रास दिला असेल याची कल्पना मी करु शकते’ अशा आशयाचे ट्विट काम्याने केले आहे.

तिच्या या ट्विटवर गौहर खानने रिट्विट केले आहे. ‘काय? त्याने बिग बॉसचे घर का सोडले?’ असे गौहर म्हणाली आहे.

आणखी वाचा- “माझ्या पत्नीने धर्मपरिवर्तन केलंय”, राहुल महाजनचा खुलासा

बिग बॉस १४मध्ये नुकताच पार पडलेल्या ‘विकेंडचा वार’ या भागामध्ये राहुल वैद्यने घरी परत जाण्यासाठी विनंती केली होती. “या शोमध्ये मला फारसा रस नसल्याने मी नीट खेळलो नाही हे मान्य करतो. मी हे मनापासून बोलतोय की, जे खरंच पात्र आहेत त्यांना बिग बॉसचं घर सोडावं लागू नये म्हणून मला या घरातून बाहेर जायचंय” असे राहुल म्हणाला होता. त्यावर घराची आठवण येत असल्यामुळे शो सोडणारा तू पहिला व्यक्ती असशील असे म्हणत सलमानने त्याचा निर्णय सांगितला.