‘थोडा उशीरच झाला, पण माझा राजकीय प्रवेशच हा मोठा विजय आहे’, असे सांगत दाक्षिणात्य सुपरस्टार ‘थलैवा’ रजनीकांत यांनी त्यांच्या राजकीय प्रवेशावर आज शिक्कामोर्तब केले. मात्र यासंबंधित अधिकृत घोषणा येत्या ३१डिसेंबरला करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून रजनीकांत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार की स्वतंत्र पक्ष काढणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागून राहिले असून त्यासाठी चाहत्यांना थर्टी फर्स्टची वाट पाहावी लागणार आहे. आजपासून पुढचे सहा दिवस रजनीकांत चेन्नईत त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधणार आहे. राघवेंद्र कल्याणा मंडपममध्ये १८ जिल्ह्यांतून हजारो चाहते त्यांच्या भेटीसाठी आले आहेत.

काही दिवसांपूर्वी कमल हसन यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिल्यानंतर रजनीकांत यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. ते राजकारणात कधी येणार याचीच उत्सुकता त्यांच्या चाहत्यांसह तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळातही होती. अखेर आज त्यांच्याही राजकारणातील प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला. ‘राजकारण माझ्यासाठी नवे नाही. पण थोडा उशीर झाला आहे. माझा प्रवेशच मोठा विजय आहे. मी ३१ डिसेंबरला यासंदर्भातील निर्णय जाहीर करेन, असे रजनीकांत म्हणाले. काही दिवसांपूर्वी चाहत्यांशी संवाद साधताना, रजनीकांत म्हणाले होते की, ‘जर मी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, तर वाईट प्रवृत्तीच्या लोकांना सदैव दूर ठेवेन.’

याआधी १९९६ मध्ये डीएमकेला समर्थन देत रजनीकांत यांनी जयललिता यांच्याविरोधात प्रचार केला होता. त्यावेळी जयललिता यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता.