'स्टार प्रवाह'च्या 'गोठ' या लोकप्रिय मालिकेने ५०० भागांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. ५०० भाग पूर्ण केल्यानिमित्त मालिकेच्या सेटवर केक कापून जोरदार सेलिब्रेशनही करण्यात आलं. आता येत्या काही दिवसात मालिकेत आणखी रंजक वळण येणार आहे. त्यामुळे राधा विलासच्या आयुष्यात पुढे काय घडणार हे पहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 'गोठ' ही मालिका प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या मालिकेवर प्रेक्षकांनी आजवर भरभरून प्रेम केलं. विलास आणि राधाच्या जोडीबरोबरच बयो आजी, अभय म्हापसेकर या खलनायकी व्यक्तिरेखांदेखील लोकप्रिय ठरल्या. प्रेक्षकांनी तर सोशल मीडियाद्वारे या जोडीचं 'विरा' असं नामकरणही करून टाकलं. गेल्या दोन वर्षांत मराठी टेलिव्हिजनवर सर्वाधिक काळ चाललेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या मालिकांपैकी 'गोठ' ही एक मालिका आहे. त्यामुळे या मालिकेचे ५०० भाग पूर्ण होणं हा निश्चितच महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे मालिकेतील कलाकारांनी एकत्र येऊन केक कापत हा आनंद साजरा केला. 'मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या प्रेमाच्या जोरावरच आतापर्यंतची वाटचाल झाली आहे. पुढेही आम्ही प्रेक्षकांना नक्कीच आनंद देत राहू, मालिकेचं कथानक अधिक रंजक करण्याचा प्रयत्न करणार आहोत', अशी भावना विलास आणि राधा अर्थात समीर परांजपे आणि रुपल नंद यांनी व्यक्त केली आहे.