बॉलिवूडमधील अभिनेता गोविंदा आणि नीलमच्या जोडीने ८० ते ९० चे दशक गाजवले. १९८६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘इल्जाम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर स्वत:च नाव कोरलं आणि प्रेक्षकांना गोविंदा आणि नीलमधील केमिस्ट्री प्रचंड आवडली. या नंतर या दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. एवढंच नाही तर गोविंदाला नीमशी लग्न देखील करायचे होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदाने याचा खुलासा केलेला आहे.

‘स्टारडस्ट मॅग्झिन’ने दिलेल्या वृत्तानुसार, गोविंदाने त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्याच्या रिलेशनशिपपासून त्याचं लग्न सुनीताशी का झालं इथपर्यंत. “माझी आणि नीलमची भेट पन्नालाल मेहता यांच्या ऑफिसमध्ये झाली होती. नीलमने पांढऱ्या रंगाची शॉर्टस परिधान केली असून ती देवदुतासारखी दिसत होती. ती मला हॅलो म्हणाली, माझं इंग्रजी चांगलं नसल्याने मी तिच्याशी बोलण्यात का कू करत होतो. मला याची देखील भीती वाटतं होती की मी सेटवर तिच्याशी कसं बोलणार. मला नीलम विषयी आणखी गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आणि माझ्याकडे सगळं असूनही मी एवढा घाबरत का होतो, मला माहित नाही, असे गोविंदा म्हणाला.”

पुढे तो म्हणाला की, “मी घरी सुद्धा नीलमबद्दल बोलायचो. एवढंच काय तर सुनीताशी माझा साखरपुडा झाल्यानंतर मी तिला नीलम सारखी रहा म्हणायचो. मी सुनीताला म्हणायचो की तू नीलमकडून शिकलं पाहिजे. एकदा सुनीताला या सगळ्या गोष्टींचा राग आला आणि ती नीलम विषयी रागात बोलली, मला तेव्हा एवढा राग आला की मी सुनीताशी साखरपुडा मोडला. माझं लग्न नीलमशी झालं पाहिजे अशी माझ्या वडिलांची देखील इच्छा होती. कारण त्यांना तिचा स्वभाव प्रचंड आवडायचा. मात्र, माझ्या आईने मला सांगितले की मी सुनीताला शब्द दिला आहे आणि ते पूर्ण झालचं पाहिजे.”

गोविंदा पुढे म्हणाला, “जेव्हा आम्ही अचानकपणे एकमेकांना भेटतो तेव्हा तिला पाहून मला खूप बरं वाटतं. पण माझं हृदय आजही तिला पाहिल्या नंतर तिथेच थांबतं. मी निराश होऊन किंचाळत असल्यासारखे मला वाटते. फक्त मी सुनीताशी लग्न केल्याचे वचन दिले नसते तर.”

गोविंदा आणि सुनीताने ११ मार्च १९८७ मध्ये लग्न झालं आहे. गोविंदाने सुनीताशी लग्न केल्यानंतर त्यांनी ही माहिती ४ वर्ष सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. त्यांना दोन मुलं असून टिना अहुजा आणि यशवर्धन अहुजा असे त्यांचे नाव आहे.