वयाच्या पंचविशीपर्यंत मनात आत्महत्येचे विचार यायचे हे बोलून दाखवलं आहे जगप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमानने. आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असतं की आपण एक माणूस म्हणून चांगले नाही. त्यावेळी माझ्या वडिलांचे निधन झाले होते. माझ्या आयुष्यात एक प्रकारचा एकटेपणा आला होता. मात्र त्या दिवसांनीच मला जगणं शिकवलं. होय हे खरं आहे की त्या दिवसात म्हणजे वयाच्या पंचविशीपर्यंत माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे. वडिलांच्या मृत्यूमुळे माझ्या मनात हे विचार यायचे कारण तोपर्यंत सगळे स्थिर स्थावर होते.

ज्यावर्षी माझे वडील गेले त्यावर्षी मला ३५ सिनेमांचे संगीत द्यायचे होते मात्र मी फक्त दोन सिनेमांना संगीत देऊ शकलो असेही रहमानने म्हटले आहे. माझ्या आयुष्यातही निराशेचा एक टप्पा आला होता. त्या दिवसांमध्ये मला काय करायचे ते सुचत नव्हते. मनात आत्महत्येचे विचार येत असत असंही या ऑस्कर विजेत्या संगीतकाराने म्हटलं आहे. पीटीआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. ए. आर. रहमानने त्याच्या आयुष्यातला संघर्ष ‘नोट्स ऑफ ड्रीम’ या पुस्तकातून सांगितला आहे. हे पुस्तक रहमानच्या आयुष्यावर असून कृष्णा त्रिलोक यांनी हे पुस्तक लिहिले आहे. दिलीप कुमार हे नाव मुळीच आवडत नव्हते असेही रहमानने स्पष्ट केले.

१९९२ मध्ये रोजा या सिनेमाद्वारे त्याने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्याच्या संगीताची जादू अनुभवली नाही असा एकही भारतीय नाही. संगीत देण्यासाठी बराचसा वेळ एकांतात घालवावा लागतो.ज्यामुळे तुम्हाला अंतर्मुख होता येते असेही ए. आर. रहमानने म्हटले आहे. त्याच्या अनेक सिनेमांची गाणी आजही लोकांच्या मनात रुंजी घालत आहेत. रोजा, बॉम्बे, हिंदुस्तानी, साथिया, गुरु, दिलसे यासारख्या अनेक सिनेमांना त्याने संगीत दिले आहे.