बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असणारी खान मंडळी आणि महानायकासह त्याच्या मुलासोबत ठुमके लगावण्याचे भाग्य फक्त राणीच्या वाट्याला आले. बॉलिवूडमधील राणी मुखर्जीचा प्रवास ती यशस्वी अभिनेत्री असल्याची पोचपावतीच आहे. 'राजा की आयेगी बारात' या चित्रपटातून राणीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आपल्या पहिल्या वहिल्या चित्रपटात बलात्कार पीडितेची भूमिका साकारताना तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले. पण व्यावसायिकरित्या राणीचा हा चित्रपट पूर्णपणे अपयशी ठरला. या चित्रपटातील भूमिकेसाठी विशेष पुरस्कार प्राप्त करून तिने बॉलिवूडमध्ये घोगरा आवाज जादुई ठरणार याचे संकेतच दिले. अभिनेत्री काजोलकडून प्रेरणा घेऊन चित्रपटसृष्टीत आलेल्या राणीला आमिर खानने 'आती क्या खंडाला..' अशी साद घातली. अन् तिच्या चित्रपटाला यश मिळण्यास सुरुवात झाली. १९९८ मध्ये राणीच्या 'गुलाम' चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धमाल केली. याच वर्षी तिने काजोल आणि शाहरूखसोबत 'कुछ कुछ होता है' चित्रपटात काम केले. बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडीसोबत तिने एकाच वेळी गुणी मुलगी, परफेक्ट प्रेयसी आणि उत्तम पत्नी अशा तिहेरी भूमिक साकारत प्रेक्षकांवर वेगळी छाप पाडली. आमिर आणि शाहरुखसोबत काम केल्यानंतर राणीने सलमान खानसोबत 'हॅलो ब्रदर्स' या चित्रपटात काम केले. राणीसाठी मटकी फोडणाऱ्या राजाला आजही तरुण विसरलेला नाही. याशिवाय अनेक चित्रपटात ही जोडी एकत्र दिसली. महानायक अमिताभ आणि 'रेफ्युजी' अभिषेक सोबतच्या 'बबली'ला फार दाद मिळाली नाही. पण अमिताभ बचन यांच्यासोबत 'ब्लॅक' चित्रपटात काम केल्यानंतर राणीला बच्चन यांचा 'खुश तो बहुत होंगे आप'.. हा डायलॉग नक्कीच लागू होणारा होता. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात राणीने मुकबधिर मुलीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला समीक्षकांसह प्रेक्षकांची चांगली दाद मिळाली. याशिवाय 'अय्या' चित्रपटातील बेली प्रकारातील ठुम्के असो वा 'मर्दानी' मधील रूबाब, राणीने तिच्या प्रत्येक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये वेगळी छाप पाडली यात शंका नाही. अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !