‘बिग बॉस’ म्हटलं की सलमान खानचा चेहरा डोळ्यांसमोर येणारच. २०१० पासून ‘बिग बॉस’ या बहुचर्चित रिअॅलिटी शोच्या माध्यमातून या ‘दबंग खान’ने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कधी यामधील वादविवाद तर कधी खूप सारं गॉसिप प्रेक्षकांना खिळवून ठेवायचे. शोच्या टीआरपीचा आलेख सतत चढता ठेवण्यामागचं महत्त्वाचं कारण सलमान खानचं सूत्रसंचालन आहे. यंदाचा सिझनही नवनवीन वादांमुळे चर्चेत येईल यात काही शंकाच नाही. मागील काही सिझनमध्ये ‘बिग बॉस’च्या शोमध्ये सहभागी झालेल्या काही स्पर्धकांनी सलमानशी पंगा घेतला होता. जाणून घेऊयात कोण आहेत हे स्पर्धक आणि सलमानशी त्यांचा वाद का झाला..

१. प्रियांका जग्गा


सामान्यांमधून अर्ज करत प्रियांका जग्गा ‘बिग बॉस’च्या दहाव्या सिझनमध्ये सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घरात दाखल झाल्याच्या आठवडाभरातच ती चर्चेत आली होती. लोपामुद्रा राऊतशी झालेल्या वादानंतर सलमानने प्रियांकाला शो सोडण्यासही सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर ‘कलर्स’ वाहिनीच्या कोणत्याही शो किंवा मालिकेत तिला घेतल्यास आपण ‘बिग बॉस’चं सूत्रसंचालन करणार नसल्याचंही त्याने बजावलं होतं.

२. स्वामी ओम


‘बिग बॉस’च्या दहाव्या सिझनमधला आणखी एक बहुचर्चित स्पर्धक म्हणजे स्वामी ओम. स्वामी ओमने बिग बॉसच्या घरात जणू उपद्रवच माजवला होता. याला वैतागून सलमानने स्वामी ओमला बाहेरचा रस्ता दाखवला. शोमधून बाहेर पडल्यानंतरही त्याने सलमानला धमकी दिली होती. आपल्या समर्थकांना सोबत घेऊन सलमानला मारहाण करणार असल्याचंही त्याने म्हटलं होतं.

३. रिमी सेन


‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्यासाठी अभिनेत्री रिमी सेनला सर्वांत जास्त मानधन दिल्याचं म्हटलं जातं. मात्र त्याबदल्यात टीआरपी मिळवून देण्यासाठी तिने विशेष कामगिरी केलं नसल्याचंही म्हटलं जातं. फक्त पैशांसाठी शोमध्ये सहभागी झाल्यावरून सलमानने तिला सुनावलंही होतं.

४. करिश्मा तन्ना


अभिनेत्री करिश्मा तन्ना ‘बिग बॉस ८’च्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. मात्र सलमान आणि तिच्यात झालेल्या वादानंतर दोघे एकमेकांकडे बघतंही नव्हते. या वादाची सुरुवात सलमानच्या चिडवण्यावरून झाली. उपेन पटेलच्या नावावरून सलमान करिश्माला चिडवत होता आणि त्यावरून इतर स्पर्धकही तिची खिल्ली उडवायचे. जेव्हा तिचा राग अनावर झाला तेव्हा शोमध्ये तिने सलमानला सुनावले.

५. कुशल टंडन


‘बेहद’ या मालिकेचा अभिनेता कुशल टंडन ‘बिग बॉस’च्या सातव्या सिझनमध्ये सहभागी झाला होता. शोमध्ये कुशलचं उद्धट वागणं सलमानला खटकू लागलं होतं. अभिनेत्री काजोलची बहीण तनिषावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर कुशलला शो मध्येच सोडावं लागलं होतं. त्यानंतर सलमानने आपली माफी मागितली म्हणून आपण शोमध्ये पुनरागमन करत आहोत असंही त्याने म्हटलं होतं. यानंतर दोघांमध्ये बरेच वाद झाले.