अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या चर्चेत आहे. गेल्या दोन वर्षांपासून श्वेता तिवारी आणि तिचा पती अभिनव कोहली यांच्यात वाद सुरू आहेत. श्वेता मुलगी पलक आणि मुलगा रेयांश यांचा सांभाळ करतेय. मात्र श्वेताने मुलाला आपल्या ताब्यात द्यावं यासाठी अभिनवची धडपड सुरू आहे. श्वेता आणि अभिनव यांच्यामधील वाद जगजाहिर आहे. सध्या श्वेता मुलांपासून लांब एका शोचे चित्रीकरण करत आहे. दरम्यान श्वेताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये रात्री मुलांचा व्हिडीओ कॉल सुरु ठेवून झोपते असा खुलासा केला आहे.

श्वेताने नुकतीच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने मुलांपासून लांब असताना त्यांच्याशी कसा संवाद साधते हे सांगितले आहे. ‘रात्रीच्या वेळी आम्ही व्हिडीओ कॉल सुरु ठेवून झोपतो जेणे करुन सकाळी उठल्यानंतर आम्ही एकमेकांना पाहू शकू. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही एकमेकांशी बोलत असतो. स्टंट करण्यापूर्वी आणि नंतर मी माझ्या मुलीशी बोलते. जेणे करुन मी तिला सांगू शकेन की मी किती घाबरले होते’ असे श्वेता म्हणाली.

आणखी वाचा : वीर सावरकरांची भूमिका कोण साकारणार? ‘या’ अभिनेत्यांच्या नावांची चर्चा

पुढे ती म्हणाली, ‘सध्याचा काळ हा सर्वांसाठीच कठीण आहे. जेव्हा मी माझ्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवला तेव्हा मला जाणवले की काम मिळणे किती गरजेचे आहे. जर काम थांबले तर सर्व काही थांबेल. तुमच्या उत्पन्नावर परिणाम होईल. ईएमआय आणि इतर खर्च देखील असतात. त्यामुळे काम करणे गरजेचे आहे.’

सध्या श्वेता ‘खतरोंके खिलाडी’ या शोचे चित्रीकरण करत आहे. त्यासाठी ती अफ्रिकेतील केपटाउन येथे गेली आहे. ती तेथून तिच्या मुलांना सतत फोन आणि व्हिडीओ कॉल करत आहे.