कॉमेडियन सुनील ग्रोव्हर याचा महिन्याभरापूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘कानपूरवाले खुरानास’ हा शो बंद होणार आहे. कपिल शर्माच्या शोच्या टक्कर देण्यासाठी सुनीलचा हा शो सुरू झाला. पण अवघ्या काही दिवसांतच तो बंद होणार आहे. याबद्दलची माहिती खुद्द सुनीलनेच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिली.

‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सुनील म्हणाला, ‘माझा शो माझ्यामुळेच बंद होतोय. हा शो मी फक्त आठ आठवड्यांसाठी साइन केला होता. कारण त्याआधीच मी ‘भारत’ या चित्रपटासाठी तारखा दिल्या होत्या. याआधी दिलेल्या मुलाखतींमध्ये मी हे स्पष्ट केलं होतं. माझ्या हातात जितका वेळ होता, तितकाच वेळ मी या शो ला देऊ शकलो. ‘भारत’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान माझ्याकडे महिनाभराचा वेळ होता. त्यामुळे हा वेळ मी सत्कारणी लावला.’

सलमान खानच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटात सुनीलची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यासाठीच त्याने हा शो सोडला. आता पुढील दीड महिना ‘भारत’चे शूटिंग चालणार आहे. १३ डिसेंबर रोजी ‘कानपूरवाले खुरानास’ हा शो सुरू झाला. यामध्ये अली असगर, सुगंधा मिश्रा, उपासना सिंह हे कलाकारसुद्धा होते. त्यासोबतच कुणाल खेमूनेही या शोद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं होतं.