‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात सलमाननं भन्साळींसोबत काम केलं होतं. त्यानंतर या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या. या चित्रपटानंतर १९ वर्षांचा काळ लोटला पण दिग्दर्शक भन्साळी आणि सलमानची जोडी काही एकत्र काम करताना पाहायला मिळाली नाही. आता मात्र इतक्या वर्षांनंतर सलमान संजय लीला भन्साळी यांच्या ‘ईन्शाल्ला’ चित्रपटात काम करण्यास तयार झाला आहे.

यामागचं कारण समोर आलं आहे. काही महिन्यांपूर्वी भन्साळी आणि सलमान खान यांची भेट झाली होती. या भेटीदरम्यान भन्साळी यांनी सलमानला चित्रपटाची स्क्रीप्ट ऐकवली होती. जर चित्रपटाची कथा सलमानला आवडली नाही तर यापुढे मी चित्रपट तयार करणं कायमचं बंद करेन असं भन्साळी म्हणाले होते. स्क्रिप्ट ऐकवताना ती सलमानला एवढी आवडली की स्क्रिप्ट वाचून पूर्ण होण्याआधीच त्यानं चित्रपटाला होकार दिला.

‘हम दिल दे चुके सनम’ नंतर सलमान आणि भन्साळींनी एकत्र काम केलं नाही. आम्हा दोघांमध्ये वाद होते मात्र हे वाद आता मिटले आहेत अशी कबुलीही चित्रपटाच्या घोषणेदरम्यान भन्साळी यांनी दिली. ‘ईन्शाल्ला’ ही प्रेमकथा असणार आहे या चित्रपटात सलमानसोबत आलिय भट्ट प्रमुख भूमिकेत असणार आहे.