छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या १४ व्या सीझनला मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली. हा शो सुरु होऊन आता तीन आठवडे उलटून गेले आहेत. शोमधील प्रत्येक स्पर्धक मोठ्या जिद्दीने ‘बिग बॉस’च्या घरात टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु सिद्धार्थ शुक्ला, हिना खान आणि गौहर खान यांना मात्र शोमध्ये दिर्घ काळ टिकून राहता आलं नाही. तीसऱ्याच आठवड्यात हे तिन्ही स्पर्धक ‘बिग बॉस’मधून एलिमिनेट झाले आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे शोमधून बाहेर पडताच हिनाने आपल्या पराजयाचं खापर सिद्धार्थवर फोडलं. “बिग बॉस १३चा विजेता निरुपयोगी असल्यामुळे मला एलिमेनेट व्हावं लागलं” अशी टीका तिने सिद्धार्थवर केली आहे.

सिद्धार्थ, हिना आणि गौहर या तिघांनी यापूर्वीच्या सीझनमध्येही भाग घेतला होता. यंदाच्या पर्वात नव्या स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना शोमध्ये येण्याचं आमंत्रण मिळालं होतं. परंतु या लोकप्रिय शोमध्ये त्यांना दिर्घकाळ टिकून राहता आलं नाही. नुकत्याच झालेल्या एका टास्कमध्ये त्यांच्या टीमला जिंकता आलं नाही. परिणामी नियमानुसार हरलेल्या टीमला बिग बॉसचं घर सोडावं लागलं.

शोमधून बाहेर पडताच हिनाने आपल्या एलिमिनेशनचं खापर सिद्धार्थवर फोडलं. ती म्हणाली, “सिद्धार्थ आमच्या टीमचा कर्णधार होता. शिवाय तो बिग बॉस १३चा विजेता देखील होता. तरी देखील त्याने योग्य प्रकारे खेळ सादर केला नाही. त्याच्या चुकांमुळेच मला शोमधून बाहेर पडावं लागलं आहे. बिग बॉस १३चा विजेता निरुपयोगी आहे. त्याच्यापेक्षा जास्त चांगलं कर्णधारपद मी भूषवलं असतं.” अशा शब्दात तिने सिद्धार्थवर टीका केली.