‘होणार सून मी या घरची’ या मालिकेद्वारे घराघरांत पोहोचलेले श्री आणि जान्हवी म्हणजेच शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान प्रत्यक्षातही लग्नाचा विचार करीत आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांच्या साखरपुडय़ाबद्दलची प्राथमिक बोलणीही झाल्याचे समजते.
‘होणार सून मी या घरची’ ही मालिका अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय झाली आणि त्यातील श्री आणि जान्हवी यांनाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या दोघांचे पडद्यावरचे रसायन पाहून श्री आणि जान्हवीने खरोखरच विवाहबद्ध व्हावे, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. या सर्व चाहत्यांची इच्छा आता पूर्ण होणार आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून शशांक आणि तेजश्री यांच्यातील मैत्रीचा रंग अधिकच गहिरा झाला आहे. दोघांच्या साखरपुडय़ासंदर्भात त्यांच्या घरच्यांची बोलणी झाल्याचेही समजते. मात्र याबाबत श्री अर्थात शशांक याच्याशी संपर्क साधला असता त्याने मौन बाळगणेच पसंत केले.