गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये यापूर्वी कधीही चर्चेत नसलेलं नाव चर्चेत आलं आहे हे नाव म्हणजेच अभिनेत्री तनुश्री दत्ता होय. या क्षेत्रात अपयश आल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून तनुश्री बॉलिवूडपासून कित्येक मैल दूर अमेरिकेत स्थिरावली होती. महिनाभरापूर्वी तनुश्री भारतात परतली. पण भारतात आल्यानंतर तिनं अनेक जुन्या वादांना पुन्हा नव्यानं तोंड फोडलं आहे.

नाना पाटेकर, गणेश आचार्य, विवेक अग्निहोत्रीवर तिनं गैरवर्तणुकीचे आरोप केले. मात्र तनुश्रीचे हे आरोप म्हणजे कमबॅकसाठी केलेला स्टंट आहे अशी अप्रत्यक्ष टीकाच ‘हॉर्न ओके प्लीज’ चे दिग्दर्शक राकेश सारंग यांनी केली आहे. कदाचित तिला या क्षेत्रात कमबॅक करायचं असेल म्हणूनच ती वादविवाद निर्माण करत आहे असा सणसणीत टोला त्यांनी एका मुलाखतीत लगावला आहे. तनुश्रीचा फार मोठा गैरसमज झाला आणि तिनं चुकीच्या पद्धतीनं हे सर्वांसमोर मांडलं असं सारंग यांचं म्हणणं आहे.

नाना पाटेकर बऱ्याच वर्षांनंतर चित्रीकरण करत होते, त्यामुळे ते खूपच उत्सुक होते. ते तिला प्रोत्साहन देत होते पण तिनं हे चुकीच्या पद्धतीनं घेतलं. जर एखाद्या माणसाला फ्लर्ट करायचंच असेल तर तो सर्वादेखत ते का करेल. शेकडो लोक तेव्हा सेटवर उपस्थित होते अशावेळी एखाद्या महिलेशी सर्वादेखत असभ्य वर्तन करण्यासाठी कोणीही धजावणार नाही असं म्हणत सारंग यांनी नाना पाटेकर यांची बाजू घेतली आहे.

तनुश्री त्यावेळी चार दिवस गाण्यावर सराव करत होती. या गाण्यात पुरुषाचा आवाजही होता तेव्हा ते गाणं केवळ तिच्या एकटीवर चित्रीत न होता आणखी एका कलाकारासोबत ते चित्रीत होणार आहे याचा अंदाच तिला आधीच होता, असंही सारंग यांनी सांगत तिचा दुसरा आरोपही त्यांनी खोडून काढला. २००८ मध्ये एका गाण्याच्या चित्रिकरणावेळी नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केलं असा आरोप तिनं केला होता. आता या आरोपानंतर नाना पाटेकर तिला कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचंही समजत आहे.