भारतीय संस्कृतीमध्ये विवाहसंस्थेला मोठं स्थान आहे. त्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत साथ देण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या जोडीदाराची निवड करत असतो. मात्र नात्यात दुरावा आल्यावर नात तुटायला जास्त वेळ लागतं नाही. त्यातच जर त्या कलाविश्वातील जोड्या असतील तर विचारायलाच नको. कारण बी टाऊनमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्या २० वर्षापेक्षा कमी काळातच विभक्त झाल्या. मात्र, यातील काही जोड्या अशाही आहेत ज्या विभक्त झाल्यानंतरही त्यांच्यातील मैत्रीचं नातं टिकून आहे. त्यातलीच एक जोडी म्हणजे ऋतिक रोशन आणि सुझान खान.

बॉलिवूडमधलं प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखल्या जाणा-या ऋतिक आणि सुझान यांचं लग्न डिसेंबर २००० मध्ये झालं होतं. मात्र नात्यातील विश्वास कमी झाल्यामुळे या दोघांनी २०१४ मध्ये कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. घटस्फोट घेण्यापूर्वी २०१३पासूनच ते वेगळे राहू लागले होते. या दोघांनी घेतलेल्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे संपूर्ण बॉलिवूडप्रमाणे त्यांच्या चाहत्यावर्गालाही धक्का बसला होता. मात्र घटस्फोटानंतरही या जोडप्यातील मैत्रीचं नातं अद्यापही टिकून आहे. याचा प्रत्ययही त्यांच्या चाहत्यांनी अनेक वेळा आला आहे.

ऋतिक आणि सुझान यांच्या मैत्रीविषयी सांगायचंच झालं तर काही दिवसांपूर्वीच ते मुव्ही डेटवर गेले होते. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी  आपल्या दोन्ही मुलांनादेखील  सोबत नेले होते. ऋतिक आणि सुझान मुव्ही टेडवर गेल्यानंतर कलाविश्वात त्यांची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. विभक्त झाल्यानंतरही हे दोघी मुलांप्रतीची आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत असल्यामुळे त्यांची सर्वच स्तरावर चर्चा होत आहे.

दरम्यान, ऋतिक सध्या त्याच्या आगामी ‘सुपर ३०’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.तरीदेखील तो आपल्या कुटुंबियांना वेळ देत असल्याचं या मुव्ही डेटवरुन दिसून आलं. या मुव्ही डेटचे काही फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत असून त्याच्यावर लाईक्सचा पाऊस पडत आहे. ‘सुपर ३०’ मध्ये ऋतिक आनंद कुमारच्या लूकमध्ये दिसून येणार आहे.