‘मन उडू उडू झालं’ ही मालिका झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेच्या प्रोमोजपासूनच मालिकेबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता खूप होती. या मालिकेत प्रेक्षकांचे आवडते कलाकार हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली आहे. या मालिकेचे दिग्दर्शन मंदार देवस्थळीने केले आहे. आता या मालिकेच्या शीर्षक गीतावर मुंबईच्या रिक्षा चालकांनी ताल धरला आहे.

‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत ही जोडी प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे. तसेच प्रेक्षक देखील मालिकेतील इंद्रा आणि दिपूच्या जोडीवरप्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. त्याचसोबत या मालिकेच्या शीर्षक गीतावर देखील प्रेमाचा वर्षाव होतोय.

अवधूत गुप्ते आणि आर्या आंबेकर यांनी गायलेलं आणि सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं प्रेक्षकांना ताल धरायला भाग पाडतं. इतकंच नव्हे तर ‘मन उडु उडु झालं’च्या उडत्या चालीवर मुंबईच्या रिक्षावाल्यांनाही ठेका धरण्याचा मोह आवरला नाही. या गाण्याच्या धूनवर रिक्षा चालकांनी तयार केलेला माहोल सध्या एका व्हिडीओतून व्हायरल होतोय. हा व्हिडीओ झी मराठीने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यातून मालिकेवर प्रेक्षकांचं असलेलं प्रेम झळकत आहे. या व्हिडीओवर नेटकरी आपल्या प्रतिक्रियांमधून मालिका आणि त्याच्या शीर्षकगीतावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.