आपल्या सभोवताली ज्या गोष्टी घडतात, त्यातून आपण नेमकं काय घेतलं पाहिजे आणि काय नाही, तसेच स्वत:ला कसे जपावे आणि वेळोवेळी बोलून कसं व्यक्त व्हावं हे आतापर्यंत सोनी मराठी वरील ‘ह.म.बने तु.म.बने’ मालिकेतून दाखवण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचा विषय जो आपल्या पाल्याच्या हितासाठी आहे, असा विषय या मालिकेत दाखवणार आहे आणि तो विषय म्हणजे ‘चांगला आणि वाईट स्पर्श कसा ओळखावा’.

पार्थच्या बाबतीत घडलेला एक प्रसंग आणि त्यामुळे हर्षदाच्या भूतकाळातील जागी झालेली कटू आठवण या कथानकावर आधारित एक एपिसोड प्रत्येकाच्या भल्यासाठी, सुरक्षिततेसाठी असणार आहे. एकेदिवशी पार्थ शाळेतून चॉकलेट खात-खात घरी येतो आणि तो सर्वांना सांगतो की त्याच्या एका मित्राच्या वडीलांनी तो नको म्हणत असतानाही आग्रहाने त्याच्या हातात चॉकलेट ठेवलं. तुलिका याकडे ब-यापैकी कौतुकाने बघते की पार्थ कसा सगळ्यांचा लाडोबा आहे आणि कसे प्रत्येकाला त्याचे लाड करावेसे वाटतात. पण याकडे हर्षदाचा बघण्याचा दृष्टिकोन जरा वेगळा आहे. कारण पार्थच्या या प्रसंगामुळे हर्षदाला तिच्या भूतकाळातील एक प्रसंग आठवतो जो तिला अस्वस्थ करुन टाकतो. कधीही आठवला जाऊ नये असा प्रसंग हर्षदाला आठवतो आणि तिच्या मनाची घालमेल सुरु होते. अस्वस्थता घालवून टाकण्यासाठी नेहमीच उपयोगीचा ठरतो तो म्हणजे ‘संवाद’.

विचित्र, अस्वस्थ करणारे प्रसंग जेव्हा घडतात तेव्हा प्रत्येकवेळी आपण ते कोणाकडे शेअर करतोच असं नाही. ब-याचदा अशा प्रसंगावर बोलले जात नाही कारण मनात एक भिती दडलेली असते. जे झालं ते बदलू शकत नसलो तरी पण त्याविषयी कोणाकडे तरी बोलून आपण मोकळे होऊ शकतो. मनात ठेवण्यापेक्षा विश्वासू व्यक्तीजवळ हे जर उघडपणे बोललो तर मनाची घालमेल होत नाही. त्यामुळे २५ फेब्रुवारीच्या भागामध्ये हर्षदा आणि तुलिका त्यांच्या मुलांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श कसा ओळखायचा हे शिकवताना दिसून येणार आहे.

‘ह.म.बने तु.म.बने’ मालिकेने नेहमीच वेगवेगळ्या विषयांतून समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यापैकीच हा एक विषय आहे, जो नक्कीच यापुढे अनेकांच्या उपयोग पडेल.