अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडमधील घराणेशाहीविरोधात पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक स्टार किड्सवर सोशल मीडियाद्वारे टीका होत आहे. अशीच काहीशी टीका अभिनेता राहुल भट्टवर देखील केली जात होती. त्याला आलिया भट्टचा भाऊ समजून नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. परंतु या ट्रोलर्समुळे आता राहुल वैतागला आहे. मी आलियाचा भाऊ नाही मला ट्रोल करु नका अशी विनंती त्याने नेटकऱ्यांना केली आहे.

“जर तुम्ही आलिया भट्टला घराणेशाहीचं प्रोडक्ट म्हणत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. तुम्ही या चळवळीला चुकीच्या मार्गावर नेत आहात. आलियाचे चित्रपट तिच्या अभिनयाच्या जोरावर चालतात. तसंच माझा आणि आलियाचा काहीही संबंध नाही. मी तिचा भाऊ नाही. त्यामुळे उगाचच मला ट्रोल करणं थांबवा.” अशा आशयाचे ट्विट राहुल भट्ट याने केले आहे. राहुलचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

राहुल भट्टने ये है मोहब्बतें या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. परंतु त्यानंतर अभिनय सोडून त्याने प्रोडक्शन क्षेत्रात आपले हात आजमावून पाहिले. ‘मेरी डोली तेरे अंगना’, ‘छू कर मेरे मन को’ आणि ‘तुम देना साथ मेरा’ या मालिकांची निर्मिती त्याने केली होती. २०१४ मध्ये त्याने अनुराग कश्यपच्या अग्ली या चित्रपटातून अभिनयात पुनरागमन केले होते. तसेच त्यानंतर राहुलने फितूर, जय गंगाजल आणि दास देव या चित्रपटांमध्ये काम केले होते.