आपण कोणाच्यातरी प्रेमात पडलो असल्याच्या आफवेला ‘कॉफी विथ करण’ शोच्या अंतिम भागात आलेल्या परिणिती चोप्राने नकार देत पुर्णविराम दिला. असे असले तरी, आपण प्रेमात पडण्यासाठी आणि रिलेशनशिपसाठी तयार असल्याचे परिणितीने करण जोहरच्या या शोमध्ये कबुल केले. २०११ सालच्या यशराज फिल्म्सच्या ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या परिणितीने २०१३ सालच्या ‘इशकजादे’ चित्रपटातील भूमिकेसाठी ‘राष्ट्रीय पुसस्कार’ मिळवला. ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये करण जोहरशी संवाद साधताना, खरोखरीच आपल्याला प्रेमात पडण्याची भावना निर्माण झाली असून, आयुष्यात कोणीतरी जवळची व्यक्ती असावी असे वाटत असल्याची कबुली परिणितीने दिली.
‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ आणि ‘शुध्द देसी रोमान्स’ चित्रपटाचा दिग्दर्शक मनीष शर्माशी तिचे नाव जोडले जात होते. आपल्याला मनीष विषयी आदर असल्याचे सांगत परिणिती म्हणाली, जेव्हा लोक मला म्हणतात की मनीषशी असलेल्या जवळकीमुळे तुला चित्रपट मिळतात तव्हा मला त्यांची घृणा येते. माझ्यासाठी मनीष हा आदी (आदित्य चोप्रा) सारखाच आहे. मला या दोघांविषयी खूप आदर आहे. मनीष आणि माझ्यात असे काही असूच शकत नाही, त्याच्याविषयी माझ्या मनात असलेला आदर हा वेगळ्या स्थरावरचा आहे. जेव्हा करणने आदरणीय व्यक्तीच्यादेखील तुम्ही प्रेमात पडू शकता असे म्हणत परिणितीला या विषयी अधिक बोलते करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती म्हणाली, होय परंतु माझ्यासाठी मनीष हा खूप वेगळा आहे, जे मला शब्दात मांडता येणार नाही. आमच्यात रोमान्स नाही, कारण मी त्याच्याकडे त्या दृष्टीने कधीच पाहिले नाही. ‘दावत-ए-इश्क’ या आगामी चित्रपटात ती आदित्य रॉय कपूरबरोबर दिसणार आहे.