बॉलिवूड चित्रपटांमधून दिलखुलास आणि बेधडक भूमिका साकारणारी अभिनेत्री काजोल खऱ्या आयुष्यात मात्र काहीशी वेगळी आहे. त्यामुळेच बॉलिवूडमध्ये अनेक वर्ष वावर असणाऱ्या या अभिनेत्रीला चंदेरी दुनियेमध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच मित्र-मैत्रिणी आहेत. विशेष म्हणजे एवढी वर्ष बी टाऊनमध्ये राहुनही तिला एकही मैत्रीण नसल्याचं तिने स्वत: यावेळी मान्य केलं.

‘नवभारत टाईम्सनुसार’, ‘हेलीकॉप्टर ईला’ या चित्रपटाच्या माध्यमातून काजोल पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. त्यामुळे सध्या ती या चित्रपटामध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने झालेल्या एका मुलाखतीमध्ये काजोलने बॉलिवूडमधील तिचे काही अनुभव शेअर केले आहेत.

‘गेले अनेक वर्ष मी बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. मात्र मी मुळातच मितभाषी स्वभावाची व्यक्ती असल्यामुळे मला फारसं सोशल व्हायला आवडत नाही. त्यामुळे मी चित्रपटांच्या सेटवरही फार कमी वेळा सहकलाकारांबरोबर वावरत असते. आजवर मी अनेक कलाकारांबरोबर काम केलं आहे. मात्र या पूर्ण कारकिर्दीमध्ये मला एकही मैत्रीण मिळाली नाही, याची खंत वाटते’, असं काजोल म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, ‘सध्याचा काळ बदलला आहे. त्यामुळे अनेक उत्तम अभिनय करणाऱ्या अभिनेत्री सध्या बी टाऊनमध्ये वावरत आहेत. आलिया, जॅकलीन, क्रिती, सिद्धार्थ, वरुण हे सध्याच्या पिढीतील माझे आवडते कलाकार आहेत. मात्र विद्या बालन माझी खास आवडती व्यक्ती आहे. विद्याला मी दोन-तीन वेळा भेटले आहे. त्यामुळे तिच्याशी माझं चांगलं पटतं’.

दरम्यान, ‘या क्षेत्रात माझी खास, हक्काची अशी मैत्रीण नसली तरी अशा अनेक व्यक्ती आहेत ज्या अडीअडचणीला माझ्या मदतीला येती.मात्र एक मैत्रीण नक्कीच हवी होती’, असं काजोल यावेळी म्हणाली. सध्या काजोल तिच्या आगामी ‘हेलीकॉप्टर ईला’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली.