यशाच्या शिखरावर असताना दुर्धर आजाराचा फटका बसल्याने अभिनेता इरफान खान सध्या रुपेरी पडद्यापासून दूर आहे. एप्रिलमध्ये इरफानला ‘न्यूरोएंडोक्राइन’ या आजाराचे निदान करण्यात आले. त्यानंतर उपचारासाठी इरफान लंडनला रवाना झाला. अजूनही त्याच्यावर उपचार सुरू असून तो निश्चितपणे कधी बरा होईल, याची माहिती नाही. उपचारामुळे त्याच्या प्रकृतीत फरक पडत असल्याचं इरफानच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे. पण भारतात कधी परतणार यावर मात्र त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही.

‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या वृत्तानुसार, मी कधी परतणार हे मलाच माहित नसल्याचं इरफाननं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे या गोष्टी कधीपर्यंत ठीक होतील याचं उत्तर शोधण्याच्या घाईत मी नाही असंही तो म्हणाला.

Photo: २० वर्षांपूर्वीच सलमान, अजय, अक्षय आणि सैफने केली होती ‘संजू’ची प्रसिद्धी

इरफानच्या आगामी ‘कारवाँ’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र त्याचं मार्केटिंग आणि प्रमोशन निर्मात्यांना बहुतेक इरफानच्या अनुपस्थितीतच करावं लागणार आहे. ‘ब्लॅकमेल’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही तो भारतात नसल्याने बॉलिवूडमधल्या इतर कलाकारांनी पुढे येत प्रमोशनमध्ये हातभार लावला होता. पण आता ‘कारवाँ’च्या प्रमोशनची जबाबदारी मल्याळम अभिनेता दलकर सलमानवरच असण्याची शक्यता आहे. या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘इरफानशिवाय चित्रपटाचं प्रमोशन करणं आव्हानात्मक आहे. पण शक्य त्या परिने आम्ही प्रमोशन करू,’ असं दिग्दर्शक आकाश खुराना म्हणाला.

देशापासून आणि चित्रपटांपासून दूर असला तरी इरफान स्वत: समाजमाध्यमांवरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधतो आहे.