करण जोहरच्या ‘शुद्दी’ चित्रपटासाठी आपल्याला कधीही विचारणा करण्यात आली नव्हती, असे बॉलीवूडचा ‘मि. परफेक्शनिस्ट’ आमीर खानने सांगितले. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना ‘शुद्धी’ चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी माझ्याकडे कधीही कोणत्याच प्रकारचा प्रस्ताव आला नसल्याचे त्याने स्पष्ट केले. ‘शुद्दी’ हा चित्रपट निर्माता करण जोहरसाठी अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प असल्याची चर्चा इंडस्ट्रीत सुरू आहे. अमिष त्रिपाठी यांच्या ‘इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहाज’ या  गाजलेल्या कादंबरीवर ‘शुद्दी’ चित्रपटाची कथा आधारित आहे. सुरूवातीला या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी ह्रतिक रोशन आणि करिना कपूर यांची निवड झाली होती. मात्र, त्यानंतर ह्रतिक रोशनला मेंदुवरील शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले होते. आजारपणातून सावरल्यानंतर ह्रतिकने आपल्या सर्व तारखा ‘बँग बँग’ या चित्रपटासाठी दिल्या. त्यामुळे शुद्धीचे चित्रीकरण बराच काळ रखडले होते. अखेर काही केल्या तारखांचा मेळ न जमत नसल्यामुळे ह्रतिकने ‘शुद्धी’वर पाणी सोडायचा निर्णय घेतला होता. ह्रतिक रोशनने चित्रपट सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर करीना कपूर हिनेसुद्धा आपण या चित्रपटातून बाहेर पडणार असल्याची घोषणा केली.