क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लग्नाने सर्व माध्यमांचे लक्ष वेधले. २०१७च्या सरतेशेवटी याच लग्नाची चर्चा पाहायला मिळाली. त्यानंतर आता २०१८मध्ये कोणकोणते सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकणार याविषयीचे तर्कवितर्क लागण्यासही सुरुवात झाली. मात्र, विराट-अनुष्काच्या लग्नाप्रमाणे माझ्या लग्नाबद्दल उत्साह पाहायला मिळणार नाही, असे अभिनेत्री तापसी पन्नूचे म्हणणे आहे. यामागचे कारणही अनेकांच्या भुवया उंचावणारे आहे. कारण, जोडीदार म्हणून ती क्रिकेटपटू किंवा श्रीमंत व्यावसायिकाची निवड करणार नसल्याचे तापसीचे म्हणणे आहे.

वाचा : ऐश्वर्या रायपूर्वी ‘या’ कलाकारांबद्दल करण्यात आलेत धक्कादायक दावे

‘माझे वैयक्तिक आयुष्य खासगी राहावे यासाठी मी फार काही प्रयत्न करत नाही. मी कोणी क्रिकेटपटू, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता किंवा एखाद्या मोठ्या भारतीय व्यावसायिकाला डेट करत नाहीये. मी लग्न करेन तेव्हा असा गजबजाट होणार नाही. सध्या बरेचजण लग्न करत आहेत. पण, मी लग्न करेन त्यावेळी भारतातील प्रसार माध्यमांना यात इतका रस असेल असे मला वाटत नाही. हे मात्र नक्की की माझं लग्न क्रिकेटपटू किंवा व्यावसायकाशी होणार नाही’, असे तापसी म्हणाली. सध्या ती ऑलिम्पिकमधील रौप्य पदक विजेता बॅडमिंटनपटू मॅथिअस बोई याला डेट करत असल्याचे म्हटले जातेय.

एखाद्याच्या यशासाठी किंवा पराभासाठी त्याच्या जोडीदाराला जबाबदार मानने चुकीचे असते असे तापसीचे मत आहे. विराट आणि अनुष्काने त्यांचे प्रेम जगजाहिर केल्यानंतर अशीच काहीशी परिस्थिती पाहावयास मिळाली होती. नुकतीच ‘जुडवा २’ मध्ये दिसलेली तापसी याविषयी म्हणाली की, ‘भूतकाळात आपण काही उदाहरणं पाहिली आहेत. एखादा व्यक्ती त्याच्या करिअरमध्ये चांगली कामगिरी करत नसल्यास त्याच्या जोडीदाराला कारणीभूत मानले जाते. त्यांचा जोडीदार तेव्हा त्यांच्यासाठी अचानक ‘बॅड लक’ समजला जातो. मला त्या विभागात मोडायच नाही, जिथे मी जे काही करेन ते माझ्या जोडीदाराच्या नशिबावर अवलंबून असेल.’

वाचा : दीपिका- रणवीर लग्न करण्याच्या तयारीत?

‘नाम शबाना’ आणि ‘पिंक’ या चित्रपटांसाठी नावाजल्या जाणाऱ्या तापसीच्या खासगी आयुष्याबद्दल अधिक चर्चा केली न जाता तिच्या कामासाठी नावाजले जाते याचा आनंद असल्याचेही तिने म्हटले.