दिग्दर्शक अनुभव सिन्हा पुन्हा एकदा चित्रपट दिग्दर्शनासाठी सज्ज झाले आहेत. हा चित्रपट प्रेमकथा, राजकीय नाट्य किंवा एखादा थ्रिलर प्रकारातील चित्रपट असू शकतो. अनुभव सिन्हा यांनी या आधी शाहरूख खानच्या ‘रा.वन’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यावेळी त्यांच्याकडे तीन कथा तयार असून, यातील एखाद्या कथेवर ते वर्षा आखेरीस काम सुरू करण्याची शक्यता आहे. यातील एक प्रेमकथा आहे, तर दुसरी राजकीय नाट्य असलेली कथा असून, शेवटची कथा ही थ्रिलर प्रकारातील आहे. या पैकी कोणत्या कथेवर काम करायचे ते सिन्हा यांनी अद्याप निश्चित केलेले नाही. वर्षा आखेरीस यातील एखाद्या कथेवरचा चित्रपट दिग्दर्शित करण्याची त्यांना आशा आहे. सिन्हा यांनी दोन वर्षासाठी स्वत:ला दिग्दर्शनापासून दूर ठेवले होते. या काळात त्यांनी स्वत:ची निर्मिती संस्था आणि ते निर्माण करत असलेल्या चित्रपटांवर लक्ष केंद्रीत केले. आता दोन वर्षाचा काळ संपला असून. ते दिग्दर्शनासाठी सिध्द झाले आहेत. ‘रा.वन’ चित्रपटानंतर सिन्हा आणि शाहरूख खान पुन्हा एकत्र काम करणार असल्याचे बोलले जात होते, परंतु अद्याप काही ठरलं नसल्याचं सिन्हा म्हणाले. या विषयी बोलताना ते म्हणाले, मला शाहरूखबरोबर पुन्हा काम करायला आवडेल. आम्ही ‘रा.वन’च्या सिक्वलबाबत चर्चा करत असतो. परंतु निश्चित असे काही ठरत नाहीये.
शाहरूख खान, अर्जुन रामपाल आणि करिना कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रा.वन’ (२०११) या सुपरहिरो प्रकारातील चित्रपटाचे दिग्दर्शन सिन्हा यांनी केले होते. दरम्यान, माधुरी दिक्षित आणि जुही चावला यांच्या भूमिका असलेल्या ‘गुलाब गँग’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची सिन्हा उत्सुकतेने वाट पाहात आहेत. सिन्हा यांच्या ‘बेनारस मिडिया वर्क्स’ बॅनरखाली निर्माण करण्यात आलेला हा चित्रपट ७ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.