बॉलीवूड स्टार सलमान खानशिवाय मी कधीही चित्रपट बनवणार नसल्याचे निर्माता आणि दिग्दर्शक अतुल अग्निहोत्री याने सांगितले. आजवर आयुष्यात सलमानने मला मार्गदर्शन केले, वेळोवेळी आधार दिला आहे. त्यामुळे सलमान हा माझ्या आयुष्यातील महत्वाचा भाग असल्याचे अतुल अग्निहोत्रीने सांगितले. अतुल अग्निहोत्रीच्या ‘ओ तेरी’ चित्रपटाची स्क्रिप्ट जेव्हा पहिल्यांदाच सलमानने वाचली, तेव्हाच या चित्रपटाचा निर्माता होण्याचे सलमानने ठरविले. ‘ओ तेरी’ चित्रपटासाठी निर्माता म्हणून सलमान खानला तयार करताना आपल्यातील नात्याचा निश्चितच फायदा झाल्याचे अतुल अग्निहोत्रीने सांगितले. सलमानला गुणवत्तेची चांगली पारख आहे त्याहीपेक्षा तो एक चांगला माणुस असल्याचे सांगत अतुलने सलमानविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली. या चित्रपटासाठी सलमान खानवर एक विशेष गाणे चित्रित झाले आहे. हा चित्रपट अधिक मनोरंजनात्मक बनविण्यासाठी या चित्रपटातील गाणी, अॅक्शन यांसारख्या घटकांवर विशेष मेहनत घेण्यात आली असून प्रेक्षकांसाठी हा चित्रपट नक्कीच चांगला अनुभव ठरेल असे अतुलने सांगितले. ‘ओ तेरी’ चित्रपटात पुलकित शर्मा आणि बिलाल अमरोही सारा जेन डायस यांच्या भूमिका असून येत्या २८ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.