काही काही माणसे बोलायला लागली की आपण फक्त ऐकणे अशी भूमिका घ्यायची असते…..
अमिताभ बच्चन त्यात कमालीच्या उंचीवर आहे. चित्रपटसृष्टीच्या भटकंतीमध्ये त्याला अनेकदा ऐकण्याचा छानसा योग येत आहे. सोनी मनोरंजन वाहिनीच्या कौन बनेगा महाकरोडपती या सातव्या पर्वाची झलक दाखवण्यच्या सोहळ्यात त्याला पुन्हा ऐकण्याचा योग आला….
ही प्रसार माध्यामांसाठी भेट होती, पण अमिताभच्या उत्साहात जराही बदल नव्हता….. तो सांगत होता. फार पूर्वी म्हणजे १९८४साली मी इलाहाबाद मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलो, तेव्हा मला काही जनसामान्य माणसे भेटायला येत. त्यांच्या समस्या, त्यांची सुख-दुःखे जाणून घेताना मी     होत असे. तेव्हा शक्या तितकी मदत मी केली. तरी काही वेळा काय बरे करावे असा मला प्रश्न पडायचा.
त्यानंतर २००० साली कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विविध समाज-जाती व स्थराच्या माणसांना भेटू लागलो. अगदी सुरुवातीला या भेटीबद्दलच्या भावना काहीशा सर्वसाधारण स्वरुपाच्या होत्या. पण नंतर नंतर माझ्या लक्षात आले या माणसांना अधिक प्रमाणावर जाणून घ्यायला हवे. काही वर्षांनी तर अगदी दूरवरच्या खेड्यापाडयातील माणसांना भेटण्याचा योग येताच माझ्यात खूप बदल होत गेला. त्या बदलांबाबत मी काहीही बोलणार, पण अनेक सामान्य जनाना भेटल्याने मी खूप अंतर्मुख झालो. पुढील जन्मी मला पत्रकार व्हावेसे वाटते असे मी थेट विधान केले नव्हते, त्या अर्थाचे काही मी बोललो व त्याला वेगेळे वळण दिले गेले.
पण पत्रकार… एकूणच प्रसार माध्यमांविषयी मला पूर्ण आदर आहे. विशेषतः बातम्यांइतकेच महत्व लेख, अग्रलेख यांना द्यायला हवे. त्यातूनच त्या वृत्तपत्राची भूमिका स्पष्ट होत असते. मग ते मराठी, गुजराती असे भाषिक असो, अथवा इंग्रजी या आंतरराष्ट्रीय भाषेतले असे समाज घडवण्याची मोठी ताकद या माध्यमात आह. त्याचे तसे व तेवढेच गांभिर्य कायम राहयला हवे. यावेळचा कौन बनेगा महाकरोडपती अधिक रंजक स्पर्धात्मक व माहितीपूर्ण करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करण्यात आले आहेत. पण मी प्रश्नाच्या निवडीकडे लक्ष देत नाही. काही काही प्रश्न व त्याची उत्तरे मलाही आश्चर्याचा मोठा धक्का देतात. मी मात्र सादरीकरणात काही रंजकता आणता येईल का हे सुचवून पाहतो. कधी कधी माझ्या सूचना योग्य वाटतात देखिल.
माणसाच्या आयुष्यात शिकण्यासारखे बरेच काही आहे. अगदी आजही माझी बरेच काही शिकण्याबाबतची जिज्ञासा कायम आहे. माझे सर्व काही शिकून झाले, आता बस्स असे कोणीही म्हणता कामा नये. या सगळ्याचा विचार करुनच ‘सिखना बंद तो जितना बंद’ या सूत्राभोवती हा कार्यक्रम आहे. यावेळी बघू मला काय शिकता येईल ते…..
अमिताभ अत्यंत नम्रपणे व मुद्देसूद बोलत असतो. त्याच्या या बोलण्यात शालिनता, सुसंस्कृतपणा, सभ्यता यांचा अगदी छानसा प्रत्यय येत असतो. त्याचे बोलणे ऐकता ऐकता बरेच काही शिकण्यासारखे राहिले याची जाणिव होत जाते. तीच तर महत्वाची आहे. अन्यथा आपलीही गत, सिखना बंद तो जितना बंद यासारखी व्हायची….
ऐवढे ऐकल्यावर अमिताभला पुन्ही ऐकायची भूक वाढलीय.