बॉलिवूड अभिनेता इम्रान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक यांच्या नात्यात प्रचंड तणाव निर्माण झाला असून काही कारणांमुळे ते विभक्त होण्याच्या चर्चा सध्या होत आहेत. घटस्फोट टाळण्यासाठी दोन्ही कुटुंबीयांचे प्रयत्न सुरु आहेत. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, या दोघांनी काही काळासाठी नात्यातून ब्रेक घेतला असून त्यांच्यातील भांडणं मिटवण्यासाठी कुटुंबीयांचे प्रयत्न सुरु आहेत.

इम्रान आणि अवंतिका यांची प्रेमकथा एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. २०११ साली इम्रान आणि अवंतिकाचा विवाह झाला होता. ‘डीएनए’च्या वृत्तानुसार अवंतिका तिच्या मुलीसोबत इम्रानच्या घरातून बाहेर पडली असून सध्या तिच्या कुटुंबियांसोबत राहत आहे. त्यांचे मित्र आणि कुटुंबीय दोघांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. २०११ मध्ये लग्न करण्यापूर्वी इम्रान आणि अवंतिका जवळपास आठ वर्ष एकत्र होते.

इम्रान खान हा आमिर खानचा भाचा असून २००८ साली ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट सुपरहिट झाला होता पण त्यानंतर मात्र इम्रान बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यात अपयशी ठरला. ‘किडनॅप’, ‘आय हेट लव्ह स्टोरीज’, ‘देल्ली बेल्ली’, मेरे ब्रदर कि दुल्हन’, ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटांमध्ये त्याने काम केले होते.