आमिर खानचा भाचा व अभिनेता इम्रान खान याने अभिनय क्षेत्राला रामराम केल्याचा खुलासा त्याच्या मित्राने केला. इम्रानचा मित्र व अभिनेता अक्षय ओबेरॉयने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला. इम्रानने २००८ मध्ये ‘जाने तू.. या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. २०१५ मध्ये ‘कट्टी बट्टी’ हा त्याचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला.

‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाला, “बॉलिवूडमधला माझा सर्वांत चांगला मित्र इम्रान खान याने अभिनय सोडलं. जवळपास गेल्या १८ वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतोय. माझ्या मते त्याच्यात एक चांगला लेखक व दिग्दर्शक दडला आहे. दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी मी त्याच्यावर दबाव आणणार नाही. त्याला जे योग्य वाटतंय ते करू दे असं माझं मत आहे.”

आणखी वाचा : हेमांगी कवीचं मुंबईत ‘घरकुल’; ‘म्हाडा’मध्ये सलग आठ वर्षे प्रयत्न केल्यानंतर लागली लॉटरी

काही दिवसांपूर्वी इम्रान त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होता. पत्नी अवंतिका मलिक हिच्याशी तो घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जात होतं. अवंतिकाची आई वंदना यांनी घटस्फोटाचं वृत्त खोटं असल्याचं स्पष्ट केलं होतं. इम्रान आणि अवंतिका यांनी २०११ मध्ये लग्नगाठ बांधली असून त्यांना इमारा ही मुलगी आहे.