बॉलिवूडमध्ये ‘मासूम’ चित्रपटाने पदार्पण करणारा अभिनेता इंदर कुमार याचे गेल्या शुक्रवारी वयाच्या ४४ व्या वर्षी निधन झाले. मध्यरात्री झोपेतच त्याचे निधन झाल्याचे म्हटले जाते. त्याची पत्नी पल्लवी हिने दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाल्याचे म्हटले. गेल्या काही दिवसांपासून इंदर सोशल मीडियावर तितकासा सक्रिय नव्हता. तत्पूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर एक मेसेज पोस्ट केला होता.

वाचा : …म्हणून ‘बाहुबली’च्या या अभिनेत्रीनं सहकलाकाराच्या थोबाडीत मारली

इन्स्टाग्रामवर इंदरने २७ जुलैला म्हणजेच निधनाच्या आदल्या दिवशीच ६ वाजून २८ मिनिटांनी शेवटचा मेसेज पोस्ट केला होता. या पोस्टमध्ये त्याने स्वतःचा एक फोटो शेअर करत ‘शांती’ ( Peace ) असे लिहिले होते. त्याची ही पोस्ट पाहिल्यानंतर इन्स्टाग्रामवर त्याला फॉलो करणारे त्याचे चाहते आणि मित्र परिवार यांना धक्का बसला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्या निधनाचे वृत्त आल्याने इंदरला आधीच त्याच्या मृत्यूची चाहूल लागल्याचे समोर आले. यावर आधी कोणाचाच विश्वास बसत नव्हता.

केवळ चित्रपटसृष्टीच नाही तर टेलिव्हिजन जगतातही इंदर कार्यरत होता. त्याने एकता कपूरच्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या प्रसिद्ध मालिकेत मिहिर विराणीची भूमिका साकारली होती. सलमान खानच्या जवळच्या मित्रांपैकी तो एक होता. त्यामुळे बॉलिवूडच्या या ‘भाईजान’च्या चित्रपटांमध्ये तो आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान, इंदर कुमारच्या पार्थिवावर शुक्रवारी वर्सोवा स्मशान भूमीत अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी बॉलिवूड किंवा टेलिव्हिजन क्षेत्रातील कोणताही मोठा स्टार उपस्थित नव्हता. इंदरच्या कुटुंबातील व्यक्ती आणि त्याच्या मित्र परिवाराव्यतिरीक्त यावेळी आयुब खान, डॉली बिंद्रा, टीना घई आणि पुनीत वशिष्ठ यांच्यासह काही नेमके कलाकार मंडळी उपस्थित होते.

वाचा : आसाम पूरग्रस्तांना आमिरकडून २५ लाखांची मदत