जिंकण्याकरता शेवटच्या चेंडूवर षटकार हवा होता, सर्व भारतीयांचे श्वास रोखले गेले होते आणि कोट्यवधी क्रिकेटवेडे प्रार्थना करत होते. अखेरच्या चेंडूवर दिनेश कार्तिकने षटकार मारला आणि सर्व भारतीयांनी एकच जल्लोष केला. निदहास चषकाच्या अंतिम सामन्यातील हा क्षण होता. भारताने बांगलादेशवर ४ गडी राखून मात केली आणि तिरंगी मालिकेचं विजेतेपद पटकावलं. यावेळी सोशल मीडियावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. दिनेश कार्तिकचंही सर्वत्र कौतुक झालं. पण यामध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी केलेल्या एका ट्विटने मात्र अनेकांचं लक्ष वेधलं. विशेष म्हणजे या ट्विटमुळे बिग बींना दिनेश कार्तिकची माफीसुद्धा मागावी लागली.

निदहास चषकाच्या रोमांचक अंतिम सामन्यानंतर बिग बींनी ट्विट केलं आणि याच ट्विटमध्ये त्यांनी एक चूक केली. ‘जबरदस्त सामना होता. भारताला जिंकण्यासाठी २ षटकात २४ धावांची गरज होती आणि कार्तिकने त्याच्या अप्रतिम खेळीने भारतीय संघाला जिंकवलं. भारतीय क्रिकेट संघाला या विजयाच्या खूप खूप शुभेच्छा,’ असं ट्विट त्यांनी केलं. या ट्विटमध्ये त्यांनी धावांचा आकडाच चुकीचा लिहिला होता. ही चूक सुधारत त्यांनी नव्याने ट्विट केलं. ‘अखेरच्या २ षटकांमध्ये २४ नाही तर ३४ धावांची गरज होती. मी दिनेश कार्तिकची माफी मागतो,’ असं त्यांनी म्हटलं.