छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘इंडियन आयडल.’ सध्या इंडियन आयडलचे १२ पर्व सुरु असून चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात स्पर्धक अंजली गायकवाड शोमधून बाहेर पडली. त्यानंतर सोशल मीडियाद्वारे चाहत्यांनी अंजलीला पुन्हा शोमध्ये घेण्याची मागणी केली. शोमधून बाहेर पडल्यानंतर आता अंजलीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

इंडियन आयडलची स्पर्धक अंजली गायकवाडने नुकताच ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने ती स्वत:ला इंडियन आयडलच्या टॉप पाच स्पर्धकांमध्ये पाहात होती असे म्हटले आहे. ‘शोमधून मला बाहेर पडावे लागले हे माझ्यासाठी धक्कादायक होते. मी कधीही विचार केला नव्हता की मी इतक्या लवकर शोमधून बाहेर पडेन’ असे अंजली म्हणाली.

आणखी वाचा : ‘चुकीची माहिती पसरवू नका’, त्या वक्तव्यामुळे हेमा मालिनी झाल्या ट्रोल

पुढे बोलताना अंजलीने तिला मत दिलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत. ती म्हणाली, ‘मी स्वत:ला इंडियन आयडलमधील टॉप ५ स्पर्धकांमध्ये पाहात होते. पण मी त्यांच्या निर्णयाचा आणि संपूर्ण देशातून मला मिळालेल्या मतांचा आदर केला. ज्यांनी माझ्यावर प्रेम केले आणि मला मत दिले त्यांचे मनापासून आभार.’

इंडियन आयडल १२ मधील अंजली गायकवाड ही सर्वांची लाडकी स्पर्धक होती. पण गेल्या आठवड्यात तिला शोमधून बाहेर पडावे लागले. त्यानंतर सोशल मीडियावर अंजलीला पुन्हा शोमध्ये घेण्यात यावे अशी मागणी केली जात होती. एक नेटकरी ट्वीट करत म्हणाला, “या कठीण काळात एखादा फोन कॉल किंवा सोशल मीडियावर येणारी प्रत्येक पोस्ट पाहून भीती वाटते. कारण त्यात काय असेल? हे कोणालाच माहिती नसते. त्यात हे एक तासाचं संगीत आम्हाला पुन्हा त्या जुन्या काळात घेऊन जातं. यापैकी कोणत्याही मुलाचं एलिमिनेशन व्हायला नको. कमीत कमी अंजली गायकवाडचं नाही, तिला परत आणा” असे म्हटले होते.