‘बॉबी’ चित्रपटातील भूमिकेनंतर ऋषी कपूर खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आले होते. या भूमिकेने त्यांनी अनेकांच्या मनावर राज्य केले. ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची पहिली भेट १९७४ साली प्रदर्शित झालेला ‘जहरीला इंसान’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटाच्या वेळी ऋषी कपूर आणि त्यांचे प्रेयसीचे भांडण झाले होते. तिला पुन्हा मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत होते. यात नीतू त्यांना मदत करत होत्या.

काही दिवसांनंतर चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण झाले. ऋषी कपूर यांना नीतू यांची आठवण येऊ लागली. युरोपमध्ये चित्रीकरणात व्यस्त असताना नीतूच्या आठवणीत त्यांनी पत्र लिहिले. ‘मला तूझी आठवण येतेय’ इतकंच त्यांनी पत्रामध्ये लिहिले होते. ‘खेल खेल’ या चित्रपटात दोघांनी पुन्हा एकत्र काम केले आणि त्यावेळी त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आले.

ऋषी कपूर आणि नीतू यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा त्यांच्या घरापर्यंत पोहोचल्या होत्या. ऋषी कपूर यांचे वडिल राज कपूर यांना हे कळताच त्यांनी ऋषी कपूर यांना नीतूसोबत लग्न करण्याचा सल्ला दिला होता. अखेर १९७९मध्ये दोघेही लग्न बंधनात अडकले. लग्नसोहळ्यात ऋषी कपूर यांना भोवळ आली होती. लग्नातील गर्दी पाहून ऋषी कपूर यांना चक्कर आली असावी असे नीतू यांनी नंतर एका मुलाखतीत सांगितले.

ऋषी कपूर आणि नीतू यांच्या लग्नसोहळ्याला अभिनेत्री रेखा यांनीदेखील हजेरी लावली होती. रेखा या लग्नाला नवरी प्रमाणे नटूनथटून आल्या होत्या. गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुकू आणि कपाळावर टिकली अशा रुपात रेखा यांनी लग्न सोहळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.