रेश्मा राईकवार माध्यमांचा समाजावर प्रभाव पडतो आणि समाजात जे घडते आहे त्याचे प्रतिबिंब माध्यमांतून उमटते. ही दोन्ही विधाने क्वचित परस्परविरोधी वाटत असली तरी त्यांचा परस्परपूरक परिणाम घडलेला गेल्या काही वर्षांत दिसून आला आहे. विशेषत: आजवर जे विषय समाजात खुलेपणाने बोलले जात नव्हते ते विषय नाटक-चित्रपट माध्यमांतून लोकांसमोर येऊ लागले. गेल्या काही वर्षांत याचा जास्त परिणाम किंवा फायदा हा स्त्रियांच्या बाबतीत घडून आलेला दिसून येतो आहे. घरादारांत वावरणाऱ्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या, आई-बहीण-प्रेयसी विविध भूमिकांतून रोज नजरेसमोर वावरणाऱ्या स्त्रियांचे अनेक प्रश्न, त्यांचे विचार, त्यांच्या शारीरिक-मानसिक गरजा असे कितीतरी पैलू नाटक आणि चित्रपटांतून वारंवार समोर येतात आणि पाहणाऱ्याला थक्क करून जातात. आपण असा विचारच कधी केला नव्हता.. म्हणत समाजात यावर चर्चा सुरू होतात. नाटकांमधून स्त्रीचे अस्तित्व अधिक प्रखरपणे समोर येते आहे, त्याच वेळी चित्रपट माध्यम अधिक संयततेने पण प्रभावीपणे स्त्रियांचे मूलभूत अधिकार, त्यांच्या लैंगिक गरजांपासून ते स्वत:साठी हरएक निर्णय घेण्याच्या अधिकारापर्यंत अनेक विषयांवर बोलते झाले आहे. ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’च्या निमित्ताने माध्यमांकडून समाजाशी आणि समाजाकडून माध्यमांशी होत असलेल्या या अनोख्या संवादाचा वेध घेण्याचा हा प्रयत्न.. एक थप्पडसुद्धा तुम्ही मारू शकत नाही, असं ठामपणे सांगणारी नायिका ‘थप्पड’ चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर पाहिल्यानंतर अनेक प्रकारच्या चर्चाना सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांत वेबसीरिज आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांमधून स्त्रीच्या लैंगिक भूमिकांविषयी स्पष्टपणे बोललं जात आहे. ‘पिंक’सारख्या चित्रपटातून स्त्री जर एखाद्या गोष्टीला नकार देत असेल तर त्यातला नाही हाच अर्थ अधोरेखित आहे, यावर भर देण्यात आला होता. ‘मनमर्जिया’सारख्या चित्रपटातून जोडीदार निवडताना तो आपल्याला शरीरसुखही देतो आहे ना हेही तिच्यासाठी महत्त्वाचं ठरतं. ‘लस्ट स्टोरीज’ किंवा ‘वीरे दी वेडिंग’मध्ये त्यापुढे जात स्त्रियांच्याही शारीरिक गरजा आहेत, यावर भर दिला गेला. एखाद्या नाजूक विषयाचा एकेक पापुद्रा अलगद उलगडत जावा इतक्या अलवारपणे हे विषय चित्रपटातून येत आहेत.. ‘स्त्रियांच्या लैंगिकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही संकुचित’ - महेश मांजरेकर लैं गिकता किंवा कामेच्छा ही अजूनही आपल्याकडे पुरुषाचा विशेष अधिकार आहे या अर्थाने पाहिली जाते. स्त्रियांसाठी ते फक्त अपत्य जन्माला घालण्यापुरतीच मर्यादित आहे, अशीच भावना समाजात रूढ आहे. स्त्रियांनी त्यांची लैंगिक गरज कशी भागवावी?, यासंबंधीचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे आणि त्यांच्या निवडीचा आदर केलाच पाहिजे. आता ‘थप्पड’सारख्या चित्रपटातून नायिका स्पष्टपणे आपली भावना बोलून दाखवते, मी वीस वर्षांपूर्वी ‘अस्तित्व’ केला त्या वेळी त्या नायिके ने आपण कुणाशी संबंध ठेवावेत याचा निर्णय घेणं आणि त्यावर ठाम राहणं ही सहजी पटणारी गोष्ट नव्हती. पण ते ‘अस्तित्व’मधून उत्तम मांडता आलं, ‘काकस्पर्श’मध्येही नायिका त्याच ठामपणे आपल्या शारीरिक गरजांबद्दल बोलते. आणि ‘पांघरूण’मध्येही तोच विषय आहे. आता स्त्रियांच्या लैंगिक गरजा, त्यांच्या इच्छांविषयी चित्रपटातून बोललं जात आहे, कारण मुळात स्त्रिया आता कुठे हळूहळू त्यांना काय हवं आहे, काय नको आहे, याबद्दल स्पष्टपणे बोलू लागल्या आहेत. मात्र अजूनही हे प्रमाण कमी आहे आणि ते शहरी भागातच आहे. आपल्याकडे कामेच्छा पूर्ण करायचा निर्णय हा पुरुषाकडूनच घेतला जातो, स्त्रीला ते संबंध त्या वेळी हवेत की नकोत?, याबद्दल विचारणाही केली जात नाही. एकतर लैंगिकता ही त्याची गरज असते किंवा त्याला हवं असणारं सुख असतं, यात स्त्रीच्या मनाचा विचारच होत नाही. आणि नातेसंबंधांवरचा हा दबाव आजही सगळीक डे कायम आहे त्यामुळे चित्रपटातून तो आवाज सहजी ऐकू यायला अजून वेळ लागेल. मात्र स्त्रियांच्या लैंगिक निवडीच्या निर्णयाचाही आदर के ला जाईल, अशी वेळ नक्कीच येईल. ‘तथाकथित नीतिमत्तेविषयीच्या संकल्पनांना आव्हान मिळेल’ - विभावरी देशपांडे स्त्रीचा लैंगिकतेकतेबद्दलचा दृष्टिकोन आणि समाजाचा स्त्रीच्या लैंगिकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन या दोन्हीचा विचार सध्या वेबसीरिजमध्ये खासकरून होताना दिसतो आहे. चित्रपटांमध्ये तर हळूहळू बदल झालेच होते, पण टेलीव्हिजन मात्र अजूनही त्याच परंपरागत विचारांच्या चौकटीत अडकलेला आहे. वेबसीरिजमध्ये हे बदल दिसतायेत याचं कारण परंपरागत नीतिमूल्ये आणि व्यवस्थेला आज समाजाकडूनच आव्हान दिलं जात आहे. ‘फोर मोअर शॉट्स’मध्ये या चार मैत्रिणी आहेत आणि त्यातल्या एकीला त्या सांगतात की शारीरिक संबंध ही तुझी गरज आहे. त्यासाठी तू एखाद्या पुरुषाची निवड कर. त्या त्यासाठी तिला लग्न करायचा सल्ला देत नाहीत, तर तुझी गरज तू भागव हे सांगताना दिसतात. माझ्या दृष्टीने स्त्रीच्या शारीरिक गरजा, इच्छांकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन खूप मोठा सकारात्मक बदल आहे. पण अनेकदा असं वाटतं की हे पडद्यावर उतरलेलं वास्तव अजून स्त्रिया तितक्याच मोकळेपणाने बघू शकतात का? म्हणजे चित्रपटातून किंवा वेबसीरिजमध्ये एखादी स्त्री म्हणत असेल की मला माझी कामेच्छा पूर्ण करण्यासाठी पुरुषाची गरज आहे तर तिच्याकडे अशी कशी ही? हिचं त्या पुरुषावर प्रेम नाही आणि फक्त शारीरिक संबंधांसाठी तिला तो हवा आहे, हे मुळात स्त्रियांना पटेल का? त्या हे वास्तव सहज स्वीकारू शकणार नाहीत, कारण पिढय़ान्पिढय़ा स्त्रियांची स्वतंत्र शारीरिक गरज आहे याचा विचारच केलेला नाही. तिची लैंगिकता ही केवळ पुरुषाला आनंद देण्यासाठी, हेच स्त्रियांच्या मनावर बिंबवलं गेलं आहे. निदान यानिमित्ताने या भरभक्कम नैतिकतेच्या संकल्पना आहेत त्यांना आव्हान मिळेल. फोर मोअर शॉट्समध्येच त्यातली नायिका भर मीटिंगमध्ये ती एका पुरुषाबरोबर सेक्स करण्याचं दिवास्वप्न पाहते आहे, असं एक दृश्य आहे. इतक्या मोकळेपणाने स्त्रियांना आपल्या लैंगिकतेविषयी बोलता येतं आहे. ते बोलू देणारे लेखक-दिग्दर्शक-निर्माते आज आजूबाजूला आहेत हाही चांगला बदल आहे. ‘महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने उचललेलं पुढचं पाऊल’ - कनिका धिल्लाँ स्त्रियांच्या लैंगिक गरजा, त्यांच्या इच्छा या आता दाबून ठेवायच्या गोष्टी राहिलेल्या नाहीत, याची खूप चांगली जाणीव सध्या चित्रपटकर्मीमध्ये दिसून येते. स्त्री म्हणजे आपल्या लैंगिक गरजा भागवण्यासाठी निर्माण के लेली वस्तू नाही. तीही माणूस आहे. तिला स्वातंत्र्य आहे. तुम्हाला जसा तुमचा जोडीदार निवडायचा अधिकार आहे तसा तो स्त्रीलाही आहे. तिला जर एखाद्याबरोबर शारीरिक संबंधांतून समाधान मिळत नसेल, तर तिने दुसरा विचार करणं हे खूप साहजिक आहे. त्यासाठी तिच्या चारित्र्यावर टीका करण्याची गरज नाही. या मुलभूत गोष्टी आहेत आणि त्याची जाणीव ठेवून त्या सध्या हिंदी चित्रपटातून मांडल्या जात आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे. एक लेखक म्हणूनही आता असे विषय चित्रपटातून मांडण्यावर कोणतंही बंधन उरलेलं नाही. उलट, आत्ताचे दिग्दर्शक-निर्माते असा आशय समजून घेऊन त्यावर चित्रपट करण्यासाठी आपणहून पुढे येतात, असा माझा अनुभव आहे. स्त्रीची लैंगिकता असेल किंवा तिचा व्यावसायिक वावर, कुटुंबातला वावर यातल्या प्रत्येक गोष्टीविषयी प्रामाणिकपणे बोलणं म्हणजेच महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने उचललेलं पुढचं पाऊल आहे. त्यामुळे ती फक्त एका स्त्रीची गोष्ट उरत नाही, माणूस म्हणून त्याचे आयाम वाढतात. ही समानता येणं त्यादृष्टीने गरजेचंच आहे. ‘समाजात घडणाऱ्या बदलांची नांदी’ - अमृता सुभाष इ तक्या स्त्री दिग्दर्शिका त्यांच्या गोष्टी घेऊन येत आहेत आणि मांडत आहेत. शिवाय, स्त्रियांच्या गोष्टी इतक्या मोकळेपणाने, खरेपणाने समजून घेणारे पुरुष लेखक-दिग्दर्शकही आता आजूबाजूला आहेत. अमुक एका पद्धतीने वागणारी स्त्री चांगली, नाही तशी वागली तर ती वाईट.. या चौकटी आता गळून पडल्या आहेत. स्त्रीकडे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून पाहणारे आणि तशीच तिला पडद्यावर चितारणारे अनेकजण आता या माध्यमांमध्ये आहेत. कुसुम देवी ही माझी ‘सेक्रेड गेम्स २’मधली व्यक्तिरेखा आहे ती एका मुलाची आई आहे. पण म्हणून ती साडी नेसून येत नाही. ती खूप वेगळ्या पद्धतीने पुरुषांवरही बंदूक रोखणाऱ्या अशा ठाम व्यक्तिरेखेतून दिसते. मुळात ती पुरूष व्यक्तिरेखा बदलून दिग्दर्शक वरुण ग्रोवरने स्त्री व्यक्तिरेखा केली. वरुण असेल अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवने हे खूप वेगळ्या पद्धतीने स्त्री भूमिका मांडताना दिसतात. ‘गल्ली बॉय’मध्ये मी साकारलेली रझिया आहे ती आपल्या मुलांसमोर नवऱ्याला विचारते, की तुला कोणी शिकवलं नव्हतं का मला कसा स्पर्श करायचा आहे? आज माझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यातून तुला आनंद मिळत नाही म्हणून तू दुसरी बाई आणलीस? मलाही मजा येत नव्हती मी दुसऱ्या पुरुषाला आणू का? इतक्या स्पष्टपणे आपल्या लैंगिकतेबद्दल बोलणारी रझिया कोणी स्त्रीवादी नाही आहे, ती झोपडपट्टीत राहणारी अशिक्षित बाई आहे. आणि ती नवऱ्याला प्रश्न करते आहे, राग व्यक्त करते आहे. ती उठाव करते तेव्हा ती तिच्या मुलालाही एक प्रकारे घडवते आहे की तू तुझ्या बायकोबरोबर असं नाही वागू शकत. ती बदलली की तिचा मुलगाही बदलणार आहे, हे खूप चांगलं होतं आहे. स्त्री आज चाकोरीतून बाहेर पडलेली आहे हे दाखवणाऱ्या या व्यक्तिरेखा आहेत. ‘थप्पड’चं खास उदाहरण द्यावंसं वाटतं. पुन्हा हा चित्रपट अनुभव सिन्हासारख्या दिग्दर्शकाने केला आहे. यात किती शांतपणे आणि तरीही ठामपणे नायिका सांगते की एक थप्पडसुद्धा तू मला मारू शकत नाहीस. आणि त्या घटनेनंतर तू माझ्या मनातून उतरला आहेस, मी नाही राहू शकत तुझ्याबरोबर.. हे ती त्याला निर्धाराने ऐकवते तेव्हा अंगावर काटा येतो. आज हे आजूबाजूला घडताना दिसतं आहे आणि जे समाजात घडतं त्याचंच प्रतिबिंब चित्रपटातून उमटत असतं. मी एका दारूचे व्यसन लागलेल्या स्त्रीची भूमिका करते आहे. अशी स्त्री नायिका आहे आणि ते एक तरुण लेखक लिहितो आहे हे वेगळं आहे. हस्तमैथुनाकडेही आपल्याकडे विकृतपणे बघितलं जातं, पण त्या गोष्टीने स्त्रीला आज लैंगिक परावलंबित्वातूनही मुक्त केलं आहे. ‘लस्ट स्टोरीज’मधल्या नायिका आपल्या लैंगिक गरजा भागवण्यासाठी पुरुषांवर अवलंबून राहत नाहीत. त्या इतर पद्धतीने आपल्या गरजा पूर्ण करतात, असं स्त्रीला करता येऊ शकतं हे वास्तव आहे. तिने तिच्या शारीरिक गरजा पूर्ण के ल्या म्हणजे ती कुठली विकृत स्त्री नाही आहे. ती काही पुरुषांची शारीरिक गरजा भागवण्यासाठी नाही आहे, तिच्या स्वत:च्या स्वतंत्र गरजा आहेत. हे किती संयत आणि सुंदर पद्धतीने मांडलं आहे. हे सगळं समाजात घडतं आहे, त्यामुळे या भूमिका बदलत चालल्या आहेत. ही एका बदलाची नांदी आहे, असं मला वाटतं. ‘समाजच लैंगिकतेबद्दल बोलायला तयार झाला आहे’ - उर्मी जुवेकर समाज बदलत जातो तशा तुमच्या गोष्टीही बदलत जातात. जास्त प्रमाणात स्त्री दिग्दर्शिका चित्रपट करतात, तेव्हा त्यांच्या जास्तीत जास्त गोष्टी पुढे येतात. अनेकदा स्त्री लेखिका पुरूष दिग्दर्शकांबरोबर काम करतात, तेव्हा त्या त्यांच्या दृष्टिकोनातून गोष्टी मांडत असतात. सगळेच लेखक-दिग्दर्शक समाजाचाच भाग आहेत. समाजामध्ये जसजशा गोष्टी घडतात, तशी त्यावरची चर्चा वाढते. ही कलेत कलेत प्रतिबिंबित होते. त्यामुळे स्त्रियांच्या लैंगिकतेचा दृष्टिकोन चित्रपटात उतरणं हे या काळाच्या बदलाचाही परिणाम आहे. कारण याआधीही अनेक पुरूष दिग्दर्शकांनी आपापल्या चित्रपटांतून या विषयांची मांडणी केली होती. मात्र तो काळच असा होता जेव्हा पुरूषांच्या लैंगिकतेविषयीही खुलेपणाने बोललं जायचं नाही. आता ‘कबीर सिंग’, ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ सारख्या चित्रपटांमधून पुरुषांच्याही लैंगिकतेत जे बदल झाले आहेत त्याविषयी बोललं गेलं आहे. आता समाजच लैंगिकतेबद्दल बोलायला तयार झाला आहे. त्याचं कारण आपली सामाजिक परिस्थितीच बदललेली आहे. अनेक मुलं आज शिक्षण-करिअरच्या निमित्ताने लांब लांब- एकेकची राहतात. त्यांचे नातेसंबंध बदलले आहेत, त्यांच्या प्रेमाच्या पध्दती, लग्नाविषयीचे विचार बदललेले आहेत. समाजात एकदा बदल घडायला लागले की ते चित्रपटांपासून दूर राहू शकत नाहीत.