‘बर्फी’नंतर गेल्या वर्षभरात प्रियांका चोप्राने बिग बजेट चित्रपट केले असले तरी तिच्या भूमिकांमध्ये फारसा दम नव्हता. गर्दीतली एक बनून राहिलेली प्रियांका यावर्षी यशराज बॅनरच्या ‘गुंडे’ चित्रपटाने नवी सुरुवात करते आहे. पण, याही चित्रपटात अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग यांच्या दोघांमध्ये किंवा दोघांबरोबर तिसरी प्रियांका असाच त्रिकोणी मामला आहे. शिवाय, रणवीर आणि अर्जुनची यारीदोस्ती पडद्यावर इतकी अफलातून रंगली आहे की, प्रियांकाच्या अस्तित्वाने फारसा फरक पडणार नाही. तरीही प्रियांकाच्या मते ती या चित्रपटाचा फार महत्त्वाचा भाग आहे. तिने साकारलेली नंदिनीची व्यक्तिरेखा ही आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे त्यामुळे पडद्यावर दोन नायक आहेत किंवा कोण याने काय फरक पडतो.. नावाने ‘गुंडे’ असलेल्या चित्रपटात प्रियांका चोप्रा वेगळ्या भूमिकेत आहे हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे ती ठणकावून सांगते..

‘क्रिश ३’मध्ये हृतिक, कंगना आणि प्रियांका होती. चित्रपटाने अमाप यश मिळवले तरी नेमकी चर्चा कोणाची झाली? ‘बर्फी’ने तर पुरस्कारही मिळवले पण, तिघांच्या गर्दीत ती थोडी बाजूला राहिली. ‘जंजीर’मध्ये तर हिंदूीसाठी नव्या असलेल्या रामचरण तेजाबरोबर ती नायिका म्हणून उभी राहिली. चित्रपट आपटला आणि प्रियांकाबद्दलची चर्चा हवेतच विरून गेली. एवढे सगळे धोके जाणवूनही तू पुन:पुन्हा अशा चित्रपटांचा भाग का बनतेस? असं तिला विचारल्यावर आपण ठरवून एकच एक जॉनरचा चित्रपट किंवा भूमिका करू शकत नाही ना.. माझ्यासाठी चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा ही एक भावना असते. कॅनव्हासवर चित्र रंगवताना आपण मी इथे लालच देणार, त्याच्या बाजूला पिवळाच देणार असं ठरवून रंग भरत नाही. त्या चित्रात एक भाव असतो. तो आपल्याला जाणवतो तसतसे आपण त्यात वेगवेगळे रंग, वेगवेगळ्या पद्धतीने भरत जातो आणि मग ते चित्र सुंदर दिसतं. माझ्यासाठी चित्रपटाची निवड ही अशाप्रकारची असते, असे प्रियांकाने सांगितले.
पण, मुळातच असे मोठे कलाकार, भव्य सेट, खूप साऱ्या अॅक्शन, ड्रामा असलेल्या चित्रपटांचा भाग व्हायला मला खूप आवडतं, असेही ती सांगते. मला खूप आवडतं अशी मोठीच्या मोठी कथा ज्यात खूप साऱ्या भावभावना आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये जो मसाला असतो ना मग त्यात नायक-नायिका, खलनायक, आई-बाबा, मुलांचं जत्रेत हरवणं-पुन्हा मीलन होणं या सगळ्या गोष्टी मला आवडतात आणि आत्ताशा असे ठासून नाटय़ भरलेले चित्रपट फारसे होतच नाहीत. त्यामुळे जेव्हा अशी संधी येते तेव्हा मी ती हातची सोडत नाही. ‘गुंडे’ असाच अॅक्शन आणि नाटय़ असलेला चित्रपट आहे म्हणूनच आपण तो स्वीकारल्याचे प्रियांकाचे म्हणणे आहे. रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांची मैत्री हा चित्रपटाचा गाभा आहे. प्रत्यक्षात ते दोघेही तितकेच नौटंकी आणि खोडसाळ आहेत. या दोघांमध्ये वयाने आणि अनुभवाने मोठी असलेल्या प्रियांकाला जमवून घेणे अवघड गेले का? असं विचारल्यावर तिला काहीतरी आठवतं. आणि मग हसत हसतच ती सांगते ते दोघेही खरोखर वेडे आहेत. त्यांना कोणीतरी वेडय़ांच्या रुग्णालयात दाखल केले पाहिजे. पण, मौजमस्तीचा त्यांचा हा भाग सोडला तर चित्रपटातही त्यांचं तसं असणं ही त्यांची गरज आहे आणि त्या दोघांनीही भन्नाट काम केल्याची पावती प्रियांका देते. आणि मी अनेक नव्या-जुन्या कलाकारांबरोबर काम केलं आहे. त्यामुळे अशा एक-दोघांना हाताळणं मला अवघड आहे असं तुला वाटतं? हे आपल्यालाच उलट विचारत ‘हिरोंना त्यांच्या जागी ठेवण्यात मी माहीर आहे..’ असा खासा डायलॉगही ती आपल्याला ऐकवते.
‘गुंडे’ चित्रपटात प्रियांकाने कॅब्रे डान्सरची भूमिका केली आहे. चित्रपटाची कथा ही सत्तर ते ऐंशीच्या दशकातली असल्याने या ‘कॅब्रे’साठी मात्र आपल्याला फार मेहनत घ्यावी लागल्याचे ती म्हणते. ‘गुंडे’मध्ये आम्ही युरोपियन कॅब्रे दाखवला आहे. आपल्याकडे कॅब्रे आणि हेलन ही दोन नावं कधीच वेगळी करता येणार नाहीत. हेलनजींचा कॅब्रे.. म्हणजे नाही आपण त्या वाटेला फिरकूही शकत नाही. ती त्यांचीच खासियत होती. त्यामुळे तिकडे न जाता पूर्णपणे त्या काळाला अनुसरून आम्ही युरोपियन कॅब्रेचा पर्याय निवडल्याचे तिने सांगितले. आपल्या भूमिकेबरोबरच आपला लुकही चित्रपटागणिक वेगळा असला पाहिजे, याकडे आपण कटाक्षाने लक्ष देत असल्याचे तिने सांगितले. या चित्रपटातली नंदिनी बंगाली आहे. त्यामुळे रंगीबेरंगी साडय़ा, लांबलचक वेणी, कपाळावर असलेली मोठी गोल टिकली असा संपूर्ण देशी लुक पहिल्यांदाच करायला मिळाल्यामुळे प्रियांका खूष आहे. या लुकसाठी आपण आपल्या आईचा चेहरा आणि तिचे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर ठेवले होते, असेही तिने सांगितले. ‘गुंडे’चा दिग्दर्शक अली अब्बास जफर हा नवीन आहे, रणवीर आणि अर्जुनही अगदी दोन-तीन चित्रपट जुने आहेत तरीही तुला चित्रपटाच्या यशावर विश्वास आहे.. असं विचारल्यावर मी सुरुवातीपासूनच प्रत्येक नव्या-जुन्या कलाकाराबरोबर काम केलं आहे. अर्जुन तर माझा मित्र आहे गेली काही वर्षे आम्ही एकमेकांना ओळखतो. रणवीरशी फारशी ओळख नव्हती पण, त्याच्या मोकळ्या स्वभावामुळे तोही प्रश्न उरला नाही. आणि त्या दोघांचा अभिनय पाहशील तर त्यांना खूप काही येतंय माझ्यापेक्षाही जास्त असं मला वाटतं. म्हणजे मी जेव्हा चौथा चित्रपट केला होता तेव्हाही अभिनयाच्या बाबतीत मी शून्य होते. आता यांच्याकडे पाहताना जाऊ दे मी तेव्हा फक्त अठरा वर्षांची तर होते क सं काय कळणार ना मला?.. असं स्वत:लाच काहीतरी कारण देऊन मनाचे समाधान करते, अशी मोकळी क बुली प्रियांकाने दिली. दिग्दर्शक अलीच्या डोक्यात काय चालू आहे, याचा मला अंदाजच लागत नव्हता. कोळसा माफियांवर आधारित या चित्रपटाची कथा-पटकथा अलीनेच लिहिली आहे. त्याचा अभ्यास एकदम पक्का आहे, त्याला आमच्याकडून काय हवंय हेही त्याला पक्कं ठाऊक आहे आणि तो त्या पद्धतीने काढूनही घेतो पण, माझी अडचण होती की त्याला काय करायचंय याचा काहीही अंदाज मला बांधता येत नव्हता, प्रियांका सांगते. पण, नंदिनीची व्यक्तिरेखा ज्या तडफेने आपण साकारली त्याचं श्रेय अलीलाच जातं असं ती सांगते. पडद्यावर नंदिनी पाहाल ना तर तिचा जो लुक आहे ना तो माझा आहे पण, तिच्यातले जे नखरे, तेवर आहेत ना ते सगळे अलीने टाकलेले आहेत.. असं ती सांगते. पण, ‘गुंडे’ हा चित्रपट यशस्वी व्हावा असे प्रियांकाला मनापासून वाटते आहे. अमिताभ बच्चन यांच्या काळात जो ‘अँग्री यंग मॅन’ चित्रपटांचा प्रभाव होता ना.. ‘गुंडे’ त्या पठडीतला आहे, असे तिला वाटते. शिवाय, कोळसा माफियांची कथा, रणवीर आणि अर्जुनच्या व्यक्तिरेखांमध्येही तोच बेकारी, भ्रष्टाचाराबद्दलची चीड आणि बंडखोरीची भावना ओतप्रोत भरलेली आहे. हा खरा टिपिकल ‘मसाला’ हिंदी चित्रपट आहे जो लोकांना आवडतो तसा तो मलाही आवडतो.. असं ती सांगते. एक अभिनेत्री म्हणून आवडेल ती भूमिका करायची आहे. उलट आजच्या काळात नायिकाप्रधान चित्रपट करायला किंवा स्त्रियांच्या समस्यांवर आधारित चित्रपट करायची आजच्या अभिनेत्रींची तयारीच नसते, असं ती स्पष्ट सांगते. इथून पुढे व्यावसायिक मसाला चित्रपटांमधूनच आपल्याला यश मिळवायचे आहे, असे प्रियांकाने सांगितले.

मुळातच मोठे कलाकार, भव्य सेट, खूप साऱ्या अॅक्शन, ड्रामा असलेल्या चित्रपटांचा भाग व्हायला मला खूप आवडतं. हिंदी चित्रपटांमध्ये जो मसाला असतो ना मग त्यात नायक-नायिका, खलनायक, आई-बाबा, मुलांचं जत्रेत हरवणं-पुन्हा मीलन होणं या सगळ्या गोष्टी मला आवडतात आणि आत्ताशा असे ठासून नाटय़ भरलेले चित्रपट फारसे होतच नाहीत. त्यामुळे जेव्हा अशी संधी येते तेव्हा मी ती हातची सोडत नाही.