गेली काही वर्ष चर्चेत असलेली क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माची जोडी ११ डिसेंबरला अखेर विवाहबंधनात अडकली आणि सर्व उलटसुलट चर्चाना पूर्णविराम मिळाला. आपल्याच कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचे लग्न व्हावे अशाच थाटात ‘विरुष्का’प्रेमींनी सोशल मीडियावरून त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केल्याचे पाहायला मिळाले. आता त्यांच्या चाहत्यांचे संपूर्ण लक्ष विरुष्काच्या वेडिंग रिसेप्शनवर आहे. येत्या २१ डिसेंबरला दिल्लीत तर २६ तारखेला मुंबईत रिसेप्शन सोहळा होणार आहे.

वाचा : अभिनेत्री स्मिता जयकर यांनी केले दुसऱ्यांदा लग्न

विरुष्काच्या लग्नात मोजून ४४ नातेवाईक उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन ग्रॅण्ड असणार यात शंका नाही. भारत-श्रीलंका क्रिकेट संघांमध्ये २४ डिसेंबरला टी-२०चा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला सामन्यांतून उसंत मिळाल्यानंतर ते २६ तारखेला विरुष्काच्या रिसेप्शनमध्ये कल्ला करतील यात शंका नाही. क्रिकेट जगतापासून बॉलिवूडपर्यंत सर्वच नामांकित सेलिब्रिटी या रिसेप्शनला उपस्थित राहणार असल्याचे कळते.

वाचा : .. म्हणून विरुष्काने गुपचूप लग्न केले; सानिया मिर्झाचा खुलासा

२१ डिसेंबरला दिल्लीतील दरबार हॉल, ताज डिप्लोमॅटिक इनक्लेव्ह येथे रिसेप्शन होईल. तर २६ तारखेला मुंबईतील अॅस्टर बॉलरुम, सेट रेगिस, लोअर परेल येथे ग्रॅण्ड रिसेप्शन होईल. या रिसेप्शनच्या निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दोन्ही निमंत्रण पत्रिकांची थीम पर्यावरणाशी निगडीत आहेत.

लग्नानंतर समोर येणाऱ्या माहितीमध्ये असंही कळतंय की, अनुष्का आणि विराट एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. देहरादूनमध्ये राहात असलेल्या अनुष्काच्या आजीनेच हा गौप्यस्फोट केला आहे. ही बाब जर खरी असेल तर स्वप्नवत वाटणारी गोष्ट आज प्रत्यक्षात उतरली असे म्हणायला हरकत नाही.