मुंबई आणि बंगळुरु यांच्यात दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात सुपरओव्हरमध्ये अखेरीस बंगळुरुने बाजी मारली. मुंबईने विजयासाठी दिलेलं ८ धावांचं आव्हान आरसीबीने सहज पूर्ण केलं. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात आरसीबीने अगदी शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. या अतितटीच्या सामन्यावर अभिनेते सुनील शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मित्रांनो इतकं रोमांचित करणारं क्रिक्रेट खेळू नका, अशानं आमचा जीव जाईल.” अशा आशयाचं गंमतीशीर ट्विट सुनिल शेट्टीने केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्याने RCB विरुद्ध MI सामन्याचं कौतुक केलं आहे.

अवश्य पाहा – VIDEO: संतापलेल्या अभिनेत्याचं शक्ती प्रदर्शन; हातांनीच केले लोखंडी गेटचे दोन तुकडे

अवश्य पाहा – महिला कलाकारांचीच चौकशी का केली जातेय?; अभिनेत्रीचा NCBला सवाल

यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मिळवलेल्या या थरारक विजयावर विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने देखील आनंद व्यक्त केला होता. “एका गरोदर बाईसाठी हा खुपच रोमांचित करणारा सामना होता.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून तिने RCB मधील खेळाडूंचं कौतुक केलं. सुनिल शेट्टी आणि अनुष्काची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

मधल्या फळीत इशान किशन आणि कायरन पोलार्ड यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने RCB विरुद्धचा सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. विजयासाठी एका चेंडूत ५ धावांची गरज असताना कायरन पोलार्डने चौकार लगावत सामना बरोबरीत सोडवला. त्याआधी २०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली होती. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, क्विंटन डी-कॉक, हार्दिक पांड्या हे सर्व फलंदाज स्वस्तात मागारी परतले होते. परंतू इशान किशन आणि कायरन पोलार्ड यांनी संयमी खेळ करत शतकी भागीदारी केली आणि सामना रंगतदार अवस्थेत आणला. इशान किशनने ५८ चेंडूत २ चौकार आणि ९ षटकारांसह ९९ धावा केल्या. अवघ्या एका धावाने त्याचं शतक हुकलं. पोलार्डने ६० धावा करत त्याला चांगली साथ दिली. आयपीएलच्या तेराव्या हंगामातली ही दुसरी सुपरओव्हर ठरली.