अभिनेते इरफान खान यांचा मुलगा बाबिल सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. तो आपल्या वडिलांसोबतचे फोटो, त्यांच्या आठवणी चाहत्यासोबत शेअर करत असतो. पण काही दिवसांपासून त्याने अचानक या आठवणी शेअर करणं थांबवलं आहे. त्याच्या आणि इरफान यांच्या चाहत्यांनाही या गोष्टीचं आश्चर्य वाटत आहे. आता त्याने यामागचं कारण सांगितलं आहे. काय आहे ते कारण? जाणून घेऊया.

दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा मुलगा बाबिल याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपल्या वडिलांच्या आठवणी शेअर करणं अचानक बंद केलं. यापूर्वी तो त्यांचे परिवाराचे फोटो, काही गोड क्षण सोशल मीडियावर शेअर करायचा, पण काही आठवड्यांपासून त्याने अशी कोणतीही पोस्ट केली नाही. त्याच्या चाहत्यांनी त्याला याबद्दल विचारलं असून त्याने आता यामागचं कारण सांगितलं आहे.

 

मी बाबांच्या आठवणी शेअर करणं का बंद केलं हे जाणू इच्छिणाऱ्या बाबांच्या चाहत्यांसाठी असं म्हणत त्याने एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. ज्यात एका इन्स्टाग्राम युजरने त्याला विचारलं की तू इरफान सरांसोबतची एखादी आठवण कधी शेअर करणार आहेस आणि त्याने कमेंट्समध्ये उत्तर दिलं आहे. या उत्तरामध्ये तो म्हणतो, “मला शेअर करायला आवडतं पण त्यानंतर मला असे मेसेजेस सारखे येतात की मी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी त्यांचा वापर करत आहे आणि त्यामुळे मी फार दुखावलो जातो. खरंतर त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर करत असतो. मी आता खूप गोंधळलेलो आहे की काय करावं? ”

“मी काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे पण खरंच फार वाईट वाटतं जेव्हा कोणीही उठून मेसेज करतं की मी त्यांच्या आठवणी शेअऱ करुन सहानुभूती मिळवत आहे. मला काहीही मिळवायचं नाही. पण मी आता खूप दुखावलो गेलो आहे. त्यामुळे मला जेव्हा योग्य वेळ वाटेल तेव्हा मी शेअर करेन. ”

गेल्या वर्षी २९ एप्रिल रोजी इरफान यांचं निधन झालं. ते दोन वर्षांपासून कॅन्सरशी लढा देत होते. बाबिल लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याचा ‘क्वाला’ हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तृप्ती डिमरी, स्वस्तिका मुखर्जी हे कलाकार दिसणार आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्माच्या निर्मिती संस्थेची ही निर्मिती असणार आहे.