दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर आणि अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान या दोघींनी गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये दणक्यात पदार्पण केलं. जान्हवीच्या ‘धडक’ आणि साराच्या ‘केदारनाथ’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पण ‘कॉफी विथ करण’मध्ये वडिलांसोबत हजेरी लावल्यानंतर, त्यानंतर प्रदर्शित झालेला ‘सिम्बा’ आणि प्रसारमाध्यमांसमोर साराचं आत्मविश्वासाने वावरणं या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर दुसरीकडे जान्हवी थोडी मागे राहिली आहे. साराचं सतत चर्चेत राहणं जान्हवीचे वडील बोनी कपूर यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.

जान्हवीच्या भविष्याची चिंता सतावत असल्याने बोनी कपूर यांनी जान्हवीच्या पीआर मॅनेजर्सनाही सुनावल्याचं कळतंय. ज्याप्रकारे साराची प्रसिद्धी होत आहे, त्याप्रकारे जान्हवीची का होत नाहीये असा सवाल त्यांनी पीआर मॅनेजर्सना विचारल्याचं समजतंय. एकंदर काय तर लेकीच्या भविष्याची चिंता सतावत असल्याने बोनी कपूर यांनी त्यांचा राग पीआर कंपनीवर काढला आहे.

वाचा : आधी मालिका पहा मग टीका करा; ‘रात्रीस खेळ चाले’च्या निर्मात्यांचे आवाहन

जान्हवी कपूरच्या हातात सध्या दोन चित्रपट आहेत. धर्मा प्रॉडक्शन्सच्या ‘तख्त’ आणि गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात ती भूमिका साकारणार आहे. तरीसुद्धा साराइतकं ती प्रकाशझोतात का नाही असा प्रश्न बोनी कपूर यांना पडला आहे. सध्या सोशल मीडियावरसुद्धा साराचीच चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात या दोघींमध्ये चांगलीच स्पर्धा होणार असून यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.