अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी एकमेकांवर चिखलफेक करून सत्य समोर येईल का, असा सवाल अभिनेत्री रेणुका शहाणेंनी केला आहे. एका नेटकऱ्याने केलेल्या ट्विटवर त्या व्यक्त झाल्या आहेत. ‘नेमकं काय घडलं हे संपूर्ण भारताला जाणून घ्यायचंय. सुशांतच्या चाहत्यांच्या भावनांना थांबवू नका. सत्य काय आहे ते सीबीआयने समोर आणू दे’, असं ट्विट एका नेटकऱ्याने केलं. त्या ट्विटला रेणुका शहाणेंनी उत्तर दिलं आहे.

‘तू बरोबर आहेस. संपूर्ण देशाला सत्य जाणून घ्यायचंय. सर्वांत आधी स्टारकिड्स मारेकरी होते, त्यानंतर बॉलिवूडमधले गँग मारेकरी ठरले, नंतर मानसिक स्वास्थ्याचा प्रश्न उपस्थित राहिला, रिया व तिच्या कुटुंबीयांवर आरोप होत आहेत आणि आता आदित्य ठाकरेंवर आरोप केले जात आहेत. अशाप्रकारे एकमेकांवर चिखलफेक करून सत्य समोर येणार आहे का? हा प्रश्न तुम्ही स्वत:ला विचारा’, असं ट्विट रेणुका शहाणेंनी केलंय.

१४ जून रोजी सुशांत सिंह राजपूतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सुशांतच्या आत्महत्येच्या जवळपास दीड महिन्यानंतर त्याच्या वडिलांनी पाटणा पोलिसांकडे अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पाटणा पोलिसांनी रियाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुशांतच्या आत्महत्येचा तपास आता मुंबई पोलिसांसोबत बिहार पोलीससुद्धा करत आहेत.