अ‍ॅमेझोन प्राइम व्हिडीओवर रिलीज झालेली ‘पाताल लोक’ ही वेब सीरिज सध्या प्रचंड गाजत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माने निर्मिती केलेली ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. एका प्रसिद्ध पत्रकाराच्या हत्येच्या कटाभोवती या मालिकेचे कथानक गुंफण्यात आले आहे. गुढ, रहस्याने भरलेल्या या वेब सीरिजची अत्यंत रंजक पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या भागापासून ही वेब सीरिज प्रेक्षकांना खिळवून ठेवते. कलाकार ही सुद्धा ‘पाताल लोक’ची एक जमेची बाजू आहे. या सीरिजमध्ये प्रत्येक कलाकाराने त्याच्या वाटयाला आलेली भूमिका अत्यंत चोख पद्धतीने बजावली आहे. त्यामुळे ‘पाताल लोक’ उत्कंठावर्धक बनली आहे.

“जेव्हा तुमच्या मेहनतीचं कौतुक होतं तेव्हा खूप बरं वाटतं. आम्ही पूर्ण निष्ठेने ही वेब सीरिज बनवलीय. पण एवढं कौतुक होईल याची अपेक्षा केली नव्हती. सोशल मीडियावर मला खूप मेसेज येत आहेत. एवढया मोठया शो चं भाग असणं हा माझ्यासाठी आशिर्वाद आहे” असे जगजीत संधू म्हणाला. इंडियन एक्सप्रेसबरोबर तो फेसबुक लाइव्हमध्ये बोलत होता. ‘पाताल लोक’ मध्ये त्याने चाकूची भूमिका साकारली आहे.

“पाताल लोकमध्ये स्वत:चे काम बघताना मी थोडा भावनिक झालो होतो. पण लोकांना माझा परफॉर्मन्स आवडेल हा मला विश्वास होता. अभिनेता म्हणून मला ते सिद्ध करायचे होते. अभिनयाची क्षमता दाखवण्याचा तो किडा माझ्यामध्ये होता. पाताल लोकने मला ती संधी दिली. चाकूची भूमिका मिळवण्यासाठी ऑडिशनमध्ये मी माझ्यापरीने सर्वोत्तम प्रयत्न केले. हा माझा रोल आहे याची मला खात्री होती. मी नाही तर भूमिकेने मला निवडलं” असं जगजीत म्हणाला.