नाट्यगृहांमध्ये नाटकाचे प्रयोग सुरू असताना प्रेक्षकांकडून मोबाईल फोनचा वापर होत असल्याने सुबोध भावे, सुमीत राघवन, विक्रम गोखले यांसारख्या नाट्यकलावंतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. नाट्यगृहांमध्ये मोबाईल फोनचा वापर टाळण्यासाठी जॅमर बसवण्याची मागणी होत होती. ही मागणी मुंबई महापालिका प्रशासनाने मान्य करत महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवला जाईल, असे स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिकेकडून बसवण्यात येणाऱ्या जॅमरची सुविधा संबंधित नाट्यनिर्माता, संस्था, आयोजक तसेच आरक्षणकर्ते यांच्याकडून लेखी स्वरुपात मागणी केल्यास प्रशासनाच्या मंजूर अटी व शर्तींनुसार उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच ही जॅमर यंत्रणा बसवल्यानंतर आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधितांची राहील. महापालिका प्रशासनाच्या या निर्णयाचे अभिनेते सुबोध भावे व सुमित राघवन यांनी स्वागत केले आहे. काय म्हणाला सुबोध भावे? प्रशासनाने घेतलेला हा निर्णय सकारात्मक आहे पण त्याचसोबत दुर्दैवीसुद्धा. लोकांनी स्वत:हून नाटकादरम्यान मोबाईल फोन बंद किंवा सायलेंटवर ठेवले असते तर असा निर्णय घेण्याची वेळ आली नसती. स्वयंशिस्त मला जास्त महत्त्वाची वाटते. लोकं ऐकत नसतील तर ही प्रशासनाची कृती अभिनंदनीय आहे. पण सक्तीची कृती व जबरदस्तीची शिक्षा याविरोधात मी नेहमीच आहे. काय म्हणाला सुमित राघवन? प्रशासनाने उत्तम निर्णय घेतला आहे. आम्ही कलाकार जो काही त्रास सहन करत होतो, अखेर त्याचा विचार केला गेला. हा निर्णय घेणं गरजेचं होतं.