एकीकडे देश करोना व्हायरस आणि त्यापासून निर्माण झालेल्या समस्यांशी लढा देत असताना दुसरीकडे आपले गृह मंत्रालय सीएएविरोधी आंदोलन केलेल्यांना अटक करण्यात व्यस्त आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी टीका केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी गृह मंत्रालयावर ताशेरे ओढले आहेत.

‘आपला देश करोना आणि स्थलांतरित मजुरांचा प्रश्न, बेरोजगारी, गरिबी या करोनापासून निर्माण झालेल्या समस्यांशी झुंज देत असताना आपले गृह मंत्रालय सीएएविरोधात (सुधारित नागरिकत्व कायदा) आंदोलन करणाऱ्यांना अटक करण्यात व्यस्त आहे. त्यांची प्राधान्यता उर्वरित भारतापेक्षा वेगळी आहे’, असं म्हणत जावेद अख्तर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोला लगावला आहे.

याआधी गायक विशाल दादलानीनेही अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. तबलिगी मरकज प्रकरण असो किंवा मग वांद्रे येथील गर्दीचे प्रकरण असतो, करोना व्हायरसचे मोठे संकट देशासमोर असताना गृहमंत्री अमित शाह अजूनही शांत का आहेत, असा सवाल त्याने उपस्थित केला होता.