दोन समांतर रेषा कधीही जुळू शकत नाहीत, त्याचप्रमाणे एकमेकांचा तिरस्कार करणारी, भिन्न स्वभावाची दोन माणसं कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. पण प्रेम अशक्य गोष्ट शक्य करू शकतं असं म्हणतात. पराकोटीच्या तिरस्कारातूनसुद्धा सरतेशेवटी प्रेमाचा अंकुर फुटतो इतकी ताकद प्रेमात असते. ती व्यक्ती समोर आली की नकोशी वाटते पण नजरेआड होताच जीवाची घालमेल होते. सिद्धी आणि शिवाच्या बाबतीत असंच काहीसं घडणार आहे. दोघेही एकमेकांचा तिरस्कार करतात, पण नियती आपला डाव खेळतेच. अशी परिस्थिती उद्भवते की सिद्धी – शिवा यांना बेसावधपणे लग्नाच्या बंधनात अडकवलं जातं आणि मग कसोटी लागते प्रेमाची. सिद्धी आणि शिवा या दोन धगधगत्या निखाऱ्यांच्या नातेसंबंधाची रांगडी प्रेमकथा 'जीव झाला येडापिसा' येत्या १ एप्रिलपासून सोम ते शनि रात्री ८.०० वा. कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चिन्मय मांडलेकर यांनी लिहिलेल्या या कथेची निर्मिती पोतडी प्रॉडक्शन्सने केली आहे. मालिकेचे विशेष म्हणजे संपूर्ण मालिका सांगलीमध्ये शूट होणार आहे. नवोदित विदुला चौघुले सिद्धीची भूमिका आणि अशोक फळदेसाई शिवाची भूमिका साकारणार आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, चिन्मयी सुमित देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. रुद्रायत या गावामध्ये मध्यमवर्ग कुटुंबामध्ये वाढलेली सिद्धी गोकर्ण ही स्वाभिमानी, तत्वनिष्ठ आणि जगाच्या चांगुलपणावर खूप विश्वास असलेली मुलगी आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवा अत्यंत धडाडीचा, शीघ्रकोपी, बोलण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारा असा रांगडा गडी आहे. सिद्धी आणि शिवा दोघेही परस्परविरोधी माणसं कुठल्या परिस्थितीत लग्नबंधनात अडकतात? एकमेकांबद्दल असं कुठलं सत्य आहे जे दोघांना माहिती नाही? तिरस्काराचा भडका प्रेमाची ऊब बनून सिद्धी-शिवाला कसं एकत्र आणेल; हा प्रवास बघणं रंजक असणार आहे. याच दिवसापासून सुखाच्या सरींनी हे मन बावरे ही मालिका रात्री ९.०० वा. प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.