अभिनेता जितेंद्र जोशीने ‘दोन स्पेशल’ या कार्यक्रमात सोशल मीडियावर होणाऱ्या आरेरावी आणि एकेरी उल्लेखाबाबत प्रश्न उभा करत चीड व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा पावसात भिजून भाषण देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा अनेकांनी ‘आरे’ ‘तुरे’ची भाषा वापरुन त्यांना ट्रोल केले होते. त्यावर जितेंद्रने त्याचे मत मांडले होते. मात्र त्याला देखील सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. आता जितेंद्रने या ट्रोलर्सला उत्तर दिले आहे.

‘मी मा. शरद पवार यांच्याविषयीच्या ट्रोल संदर्भात जे बोललो त्यासोबतच मी असेही म्हटले की “कुठल्याही ज्येष्ठ व्यक्तीविषयी” भाषा सभ्यतेचीच हवी मग ती व्यक्ती कुठल्याही पक्षाची, जातीची किंवा लिंगाची असो. तरीही त्यावरून अर्वाच्य भाषेत मला बोलले जाते आहे हे दुर्दैवी आहे’ असे म्हणत जितेंद्रने खंत व्यक्त केली आहे.

जितेंद्र जोशीने ‘दोन स्पेशल’ या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात ट्रोलर्समुळे आलेला वाईट अनुभव सांगितला होता. ‘मी शरद पवार यांचा पावसात भिजत भाषण देतानाचा फोटो पाहिला. त्याच्यावर लोकांनी खाली आरे, तुरे लिहित कमेंट केल्या होत्या. एका माणसाने काही काळ त्या क्षेत्रात घालवली आहेत. त्याच्या विषयी आदराने तरी बोला’ अशा शब्दात सोशल मीडियावर एकेरी आणि अर्वाच्च भाषेत होणाऱ्या ट्रोलिंगवर जितेंद्रने संताप व्यक्त केला होता.

आणखी वाचा : शरद पवारांना आरे तुरे काय करता? जितेंद्र जोशी संतापला

विधानसभा निवडणूकी दरम्यान शरद पवारांनी सातारा येथे सभा घेतली होती. दरम्यान तेथे अचानक पाऊ पडू लागला. मात्र शरद पवार यांनी न थांबता भाषण सुरु ठेवले. भर पावसात त्यांनी केलेल्या भाषणाची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती. त्यांचा हा उत्साह पाहून कार्यकर्तेही भारावून गेले होते.

आणखी वाचा : शाहरुख नाही तर ‘ही’ आहे बुर्ज खलिफावर झळकणारी पहिली भारतीय व्यक्ती

कलर्स मराठी वाहिनीवरील जितेंद्र जोशीचा ‘दोन स्पेशल’ हा कार्यक्रम एकाच एपिसोडनंतर चर्चेत आहे. ‘दोन स्पेशल’ या कार्यक्रमात कलाकारांच्या आयुष्यातील जगासमोर न आली गुपिते समोर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अभिनयाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून त्यांच्या रोजच्या जगण्यातले अनुभव, त्यांची मते, त्यांचे विचार गप्पांच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात अभिनेता सुबोध भावे व सुमीत राघवन या दोन मित्रांनी हजेरी लावली होती. या दोघांच्या आयुष्यातील बरेचसे किस्से कार्यक्रमात ऐकायला मिळाले.