अभिनेता आमिर खानला बॉलिवूडमध्ये एण्ट्री करून आज 33 वर्ष पूर्ण झाली आहे. आजच्या दिवशीच म्हणजेच 29 एप्रिल 1988 ला आमिर खानचा 'कयामत से कयामत तक' प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा त्यावेळी चांगलाच गाजला. या सिनेमाला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली होती. या सिनेमातील जूही चावला आणि आमिर खानची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. तर सिनेमातील गाणी देखील सुपरहीट ठरली. मात्र याच सिनेमातील 'अकेले हैं तो क्या गम' या गाण्याच्या शूटिंगवेळी जूही चावलाने आमिर खानच्या गालावर किस करण्यास नकार दिला होता. डीएनएच्या वृत्तानुसार एका मुलाखतीत सिनेमाचे दिग्दर्शक मंसूर खान यांनी सांगितलं, " आम्ही 'अकेले हैं तो क्या गम' या गाण्याचं शूटिंग करत होतो. मी जूहीला म्हणालो तुला आधी आमिरच्या एका गालावर किस करायचंय , मग दुसऱ्या गालावर आणि नंतर कपाळावर किस करायचं आहे. त्यानंतर काही वेळाने माझा एक सहकारी येऊन म्हणाला की जूहीने हा सीन करण्यास नकार दिलाय. त्यानंतर मी सेटवरील सर्वांना म्हणालो की सगळयांनी हातातली काम लगेच बंद करा आणि फक्त बसून रहा. त्यानंतर जूही आली आणि ती सीनसाठी तयार झाली. यानंतर आम्ही शूटिंग सुरू केलं." असं मंसूर खान यांनी सांगितलं. कयामत से कयामत तक’, या सिनेमासोबतच ‘हम हे राही प्यार के’, ‘लव्ह लव्ह ’, ‘इश्क’ यांसारख्या चित्रपटातून दोघांनी एकत्र काम केलं. मात्र रुपेरी पडद्यावरची ही हिट जोडी तब्बल सात वर्षे एकमेकांसोबत अबोला धरून होती. आणि आमिर खान जूहीच्या हातावर थुंकला! 1997 सालात आलेल्या ‘इश्क’ सिनेमाच्या सेटवर सर्वांच्या समोर आमिरने भविष्य वाचण्यासाठी जूहीला हात पुढे करण्यासाठी सांगितलं. तिने हात पुढे करताच आमिर तिच्या हातावर थुंकला आणि त्याने पळ काढला. आमिरचा राग आल्याने जुहीने दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या शूटिंगला येण्यास नकार दिला. यावर आमिरलादेखील जूहिचा राग आला.या घटनेनंतर दोघेही सात वर्ष एकमेकांशी बोलत नव्हते.