शाहरुख खानचा ‘जब हॅरी मेट सेजल’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. पण मागच्या गोष्टींचा फारसा विचार न करता तो पुढच्या सिनेमाच्या कामालाही लागला. आगामी सिनेमात तो दोन भूमिका साकारताना दिसणार आहे. ज्यातील एक व्यक्तिरेखा ही बुटकी दाखवण्यात येणार आहे. या सिनेमात तो ‘ओम शांती ओम’ सिनेमातील ‘धूम’ गाण्याला वापरण्यात आलेली रणनीती पुन्हा एकदा वापरणार आहे. हे आम्ही नाही तर चक्क जुही चावलाने सांगितले आहे. जुही म्हणाली की, त्याच्या आगामी सिनेमातील एका गाण्यात त्याच्यासोबत आतापर्यंत काम केलेल्या अनेक अभिनेत्री कॅमियो करताना दिसतील. तसेच या गाण्यात अभिनेत्रींसोबत सलमान खानही कॅमियो करणार आहे.

श्रीदेवी, करिश्मा कपूर, काजोल, रानी मुखर्जी, आलिया भट्ट, जुही चावला आणि दीपिका पदुकोण या अभिनेत्री गाण्यात दिसू शकतात. ‘शाहरुखने मला या सिनेमाचे चित्रीकरण करायला सांगितले होते. सिनेमात असा एक प्रसंग आहे जिथे आमच्या काळातले अनेक कलाकार दिसतील.’ यानंतर जुही म्हणाली की, हे पूर्णपणे ‘ओम शांती ओम’ सिनेमाच्या गाण्यासारखे नसेल. ‘धूम’ हे गाणे ६० च्या दशकावर आधारित होते. पण या सिनेमात ९० चे दशक दाखवण्यात आले आहे.

पण हे बोलल्यानंतर ती अचानक थांबली. बोलण्याच्या नादात सिनेमाबद्दल अधिक माहिती दिली याची जाणीव तिला झाली. ‘मी याहून जास्त काही सांगू शकत नाही, नाहीतर शाहरुख माझा जीवच घेईल.’ आपल्या आगामी सिनेमाबद्दल सांगताना जुही म्हणाली की, ती अनिल कपूरसोबत विनोदीपटातही दिसणार आहे.