झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी ह्य़ा घरची’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय मालिकांच्या पाठोपाठ आणखी एक मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे. जय आणि आदिती ही जोडी ज्या मालिकेमुळे लोकप्रिय झाली ती ‘का रे दुरावा’ही मालिका आता संपणार आहे. येत्या २६ मार्च रोजी मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.

झी मराठीवरील या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. मालिकेतील सर्व पात्रे प्रत्येक घराघरात पोहोचली. ‘का रे दुरावा’ही मालिका गेल्या एक ते सव्वा वर्षांपासून सुरू आहे. मालिकेतील जय-आदितीबरोबरच केतकर काका व काकू, आऊ, अविनाश सर, कदम काका, रजनी आणि ‘देव टुर्स’च्या कार्यालयातील सर्वच पात्रे लोकप्रिय आहेत. कार्यालयातील विचित्र नियमामुळे जय व आदिती यांनी लपविलेले आपले लग्न, त्यातून त्यांची होणारी कुचंबणा, कार्यालयातील वातावरण, हेवेदावे, संघर्ष या मालिकेत मांडण्यात आला आहे. अन्य मालिकांपेक्षा थोडा वेगळा विषय असल्याने मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

आता मालिकेचा प्रवास सांगतेकडे सुरू झाला आहे. मालिकेचा शेवट कशा प्रकारे केला जाणार त्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. जय आणि आदितीचे लग्न झालेले आहे आणि त्यांनी ते कार्यालयातील सर्व सहकाऱ्यांपासून लपवून ठेवले हे उघड होते की अन्य प्रकाराने मालिकेचा शेवट केला जाणार, त्याबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत.

या मालिकेच्या जागी येत्या २८ मार्चपासून ‘काहे पिया परदेस’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. सोमवार ते शनिवार या दिवशी दररोज रात्री नऊ वाजता मालिकेचे प्रसारण होणार आहे.