सशक्त आणि अगदी बांधेसूद पटकथा, चांगले प्रॉडक्शन हाऊस या दोन गोष्टी भूमिकेएवढय़ाच महत्त्वाच्या असतात. कौटुंबिक जबाबदारी आणि देवगण फि ल्म प्रॉडक्शनचा व्याप सांभाळण्यात व्यस्त असलेली काजोल सध्या अशाच एका चांगल्या पटकथेच्या शोधात आहे.
विवाहानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांना प्राधान्य देणाऱ्या काजोलने २००६ मध्ये आमिर खानबरोबर ‘फना’ चित्रपट केला. त्यानंतर पुन्हा चार वर्षांनी म्हणजे २०१० मध्ये तिने करण जोहरच्या ‘वुई आर फॅमिली’ या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारली होती. त्यानंतर मात्र काजोलने जाहिरातींवर लक्ष केंद्रित केले पण, चित्रपटात येणे तिने कटाक्षाने टाळले. चांगल्या पटकथा नसल्याचे कारण पुढे करीत तिने चित्रपटापासून दूर राहणे पसंत केले. चित्रपट नसले तरी दोन्ही मुलांचे संगोपन हे माझे पूर्णवेळ काम आहे आणि या कामाचा क्षण न् क्षण मला आनंद, समाधान देऊन जातो, असे काजोलने म्हटले आहे.
‘अजय देवगण फिल्म्स’ या होम प्रॉडक्शनची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर नाही. पण प्रॉडक्शनच्या कामावर स्वत: देखरेख केल्याशिवाय मला चैन पडत नाही. त्यामुळे या दोन जबाबदाऱ्या सांभाळून चांगला चित्रपट करायची संधी मिळणार असेल तरच मी तो क रीन, असे सांगणाऱ्या काजोलने अजयपेक्षा शाहरूख आणि तिची जोडी पडद्यावर जास्त लोकप्रिय ठरल्याचेही मान्य केले. शाहरूखचा आणि माझा स्वभाव एकदम धम्माल आहे. आम्ही जे चित्रपट केले ते आमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे होते. शिवाय, आमच्या दोघांमधली मैत्री इतकी घट्ट आहे की त्याचेही प्रतिबिंब आमच्या कामांमध्ये उमटायचे, असे काजोलने सांगितले.