पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. या भाषणादरम्यान मोदींनी ‘आत्मनिर्भर’ या शब्दाचा अनेकदा उच्चार केला. मात्र या शब्दावरुन अभिनेता कमाल खानने मोदींना उपरोधिक टोला लगावला आहे. या ‘आत्मनिर्भर’चं करायचं काय? असा प्रश्न त्याने विचारला आहे.

अवश्य पाहा – ‘महाभारता’मध्ये या WWE सुपरस्टारने साकारलेली ‘भीम’ ही व्यक्तिरेखा

कमाल खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच विविध क्षेत्रातील लोकांवर टीका करत असतो. यावेळी त्याने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “एक तर व्यवसाय ठप्प आहेत. आणि अशा आर्थिक संकटात ‘विकास’चा लहान भाऊ ‘आत्मनिर्भर’ जन्माला आला आहे. आता कळत नाही आहे की करायचं तरी काय?” अशा आशयाचं ट्विट कमाल खानने केलं आहे. कमालचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – मराठी अभिनेत्रीचा पतीसोबत बोल्ड अवतार; फोटो होतोय व्हायरल

भाषण करताना काय म्हणाले होते मोदी?

करोनापूर्वीचे आणि नंतरचे जग बदललेले असेल. अशा वेळी विश्वाला पुढील मार्ग दाखवण्याचे काम भारताला करावे लागेल. करोनाआधी भारताकडे पीपीई, एन-९५ मास्क नव्हते. दररोज आता २ लाख पीपीई, २ लाख एन-९५ मास्क बनवले जात आहेत. जागतिकीकरणात आत्मनिर्भरतेचा अर्थ बदललेला असेल. त्या अर्थाने २१ शतक भारताचेच असेल. भारत विश्वाला कुटुंब मानतो. देशाची आत्मनिर्भरता आत्मकेंद्रित कधीच नव्हती. टीबी, कुपोषण, पोलिओ विरोधातील लढा जगावर प्रभाव टाकतो. भारताची औषधे जगाला नवी आशा देतात. जग भारताची प्रशंसा होते. मानवजातीच्या कल्याणासाठी १३० कोटी देशवासीयांचा आत्मनिर्भर होण्याचा संकल्प विश्वाला बरेच काही देऊ शकतो, असं मोदी जनतेशी संवाद साधताना म्हणाले.